पालेभाजीच्या नावाखाली तुम्हाला पशूखाद्य तर दिले जात नाही ना ?

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये (उपाहारगृहामध्ये) पालेभाज्या खाणे ठरेल घातक ! जेवणापूर्वी ‘या’ गोष्टींचा करा विचार !

सध्या अनेक जण बाहेरचे हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट येथील जेवण आवडीने खातात, तर काहींना ‘ऑनलाईन’ किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ आवडतात; परंतु बाहेर खाण्याची ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते; कारण बाहेरील अन्नपदार्थांमध्ये अनेकदा भेसळ किंवा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. यामुळे अन्नातून विषबाधा आणि पोटाचा संसर्ग होऊ शकतो. यात विशेषत: पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ खाणे तुम्ही टाळले पाहिजे; कारण पालेभाज्यांमध्ये अनेकदा वेगवेगळे गवत आणि इतर रानभाज्याही असतात की, नीट स्वच्छ न करताच बनवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला विविध आजार होऊ शकतात.

पालेभाज्यांमध्ये बरसीम गवताची भेसळ असण्याची शक्यता

पालकाची भाजी किंवा कोणत्याही पालेभाज्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाबा येथे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते; कारण उपाहारगृह आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांमधील पालेभाज्यांमध्ये बरसीम गवताची भेसळ असू शकते. हे गवत प्राण्यांचे खाद्य आहे. त्यामुळे हे जर मानवाने खाल्ले, तर पचनसंस्था बिघडू शकते. तसेच अपचन, गॅस आणि जुलाब होऊ शकतात.

भाज्या व्यवस्थित स्वच्छ न केल्याने विविध आजारांचा धोका

यासोबत पालेभाज्यांमध्ये अनेकदा तण किंवा जंगली गवतही असते. अनेक हॉटेल किंवा उपाहारगृहवाले या भाज्या व्यवस्थित स्वच्छ न करता वा न धुता वापरतात. यामुळे अनेक सूक्ष्मजंतू किंवा कीटक त्यात राहू शकतात. परिणामी विविध आजारांचा धोका निर्माण होतो. याखेरीज अनेक ठिकाणी पालक पालेभाजीसह मुळा, कोबी यांची पाने आणि इतर गोष्टींचीही भेसळ असू शकते की, जे आपल्या पोटासाठी घातक ठरू शकते.

खराब पालेभाज्यांमुळे अनेक आजार होऊ शकतात. या भाज्या व्यवस्थित स्वच्छ न करता वा न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊन आजार गंभीर रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी उपाहारगृहामधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ, २२.३.२०२३)