समाजातील विरोधाला धैर्याने तोंड देणारे आणि ईश्वरी शक्ती देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

श्रीमती स्मिता नवलकर

१. कोरोना महामारीच्या काळातही समाजातील वाचक आणि साधक यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आवश्यक असलेले मार्गदर्शन अविरतपणे मिळणे

‘वर्ष १९९९ (गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती) ते २००० (मुंबई, ठाणे, रायगड आवृत्ती) पासून दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित होत आहे. त्याला आज दोन तपे झाली आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्याचे कार्य ते एका योग्यासारखे अविरत करत आहे. आतापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १. मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ २. गोवा आणि सिंधुदुर्ग ३. रत्नागिरी ४. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा चार आवृत्त्या चालू झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत एक दिवसही खंड न पडता ते अविरत कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या काळातही गोवा आवृत्तीचे वितरण चालू होते आणि अन्य आवृत्या ‘ऑनलाईन’ चालू होत्या. त्यामुळे समाजातील वाचक आणि साधक यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळत होते.

२. प्रारंभी दैनिक ‘सनातन प्रभात’ला विरोधकांकडून विरोध होऊन त्यावर बंदी आणण्यासाठी बरेच प्रयत्न होणे आणि हे ईश्वरी कार्य असल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’ने  योद्धा बनून सर्व विरोधाला धैर्याने तोंड देणे

प्रारंभी दैनिक ‘सनातन प्रभात’ला समाजातील विरोधकांकडून विरोध होऊन त्यांनी त्यावर बंदी आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे ईश्वरनिर्मित आहे. त्यामुळे ते प्रतिदिन प्रकाशित झाले. एक दिवसही थांबले नाही. त्या वेळी विरोधकांनी आमच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचे बरेच प्रयत्न केले; परंतु आम्हा साधकांना गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) दिलेले आत्मबळ आणि मनोबल यांमुळे रोखठोक उत्तरे देता आली. गुरुदेवांचे पाठबळ आणि त्यांचाच संकल्प यांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे कधीच बंद होणार नाही. ईश्वराचे कार्य ईश्वरच आम्हा साधकांकडून करून घेत आहे आणि तोही (ईश्वरही) करत आहे, याची अनुभूती आम्ही साधक घेत आहोत. दैनिक ‘सनातन प्रभात’ने योद्धा बनून सर्व विरोधाला धैर्याने तोंड दिले.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे शासकीय आणि राजकीय क्षेत्रांतील अयोग्य कृतींना एक व्यासपीठ मिळणे आणि वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पुष्कळ हिंदु संघटना एकत्र येणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला धर्मशिक्षण, मंदिरे आणि देवता यांच्या विडंबनाविषयी, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील गैरप्रकार आणि घोटाळे सर्व जगासमोर आले. आता ‘लँड जिहाद’ या धर्माधांच्या धर्म आणि राष्ट्र विरोधी कारवायांना वाचा फोडल्यामुळे ते समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोचले अन् लोकांमधे जागृतीही झाली. हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदूसंघटन, धर्मांतराच्या विरोधात करत असलेल्या मोहिमा, अन्य धर्मियांचे घोटाळे आणि अपप्रकार, शासकीय आणि राजकीय क्षेत्रांतील अयोग्य कृतींना सर्वासमोर मांडता आले. दैनिक ‘सनातन प्रभात’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे पुष्कळ हिंदु संघटना एकत्र आल्या. त्यांना एक व्यासपीठ मिळाले.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केल्यामुळे ‘समाज मनावरील नकारात्मक विचारांचे आवरण दूर होऊन त्यांना ईश्वरी शक्ती मिळत आहे’, असे लक्षात येणे

‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण’ यांच्या कार्याला ईश्वरी कृपेमुळे यश मिळाले आणि समाज जागा झाला. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन आणि वितरण यांमुळे प्रसार झाला. त्यामुळे ‘समाजमनावरील नकारात्मक विचारांचे आवरण दूर होऊन त्यांना ईश्वरी शक्ती मिळत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

दैनिक ‘सनातन प्रभात’ आता नुसते सैनिक राहिले नसून, ते ‘सैन्यातील सेनापती’ झाले आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे इतके मोठे झालेले पाहून आम्हाला अभिमान वाटतो आणि ‘त्याची ख्याती अशीच जगभरात होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !

गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अशा दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई, वितरण, विज्ञापने आणणे आणि वर्गणीदार बनवणे इत्यादी सेवांची संधी आम्हा साधकांना देऊन आमची व्यष्टी आणि समष्टी साधना करून घेऊन ते आमची अध्यात्मात प्रगती करून घेत आहेत, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञतापुष्पे अर्पण करते.

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थना करते की, त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्याची महती अन् ते करत असलेल्या कार्याविषयी लक्षात आलेली सूत्रे लिहून घेतल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.४.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक