हुगळी (बंगाल) येथे पुन्हा हिंसाचार !

  • दगडफेकीनंतर रिशरा रेल्वे स्थानक बंद !

  • हावडा-बर्डमन मार्गावरील रेल्वेगाड्या रहित !

धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामुळे झालेला हिंसाचार अद्यापही चालूच !

कोलकाता – श्रीरामनवमीनिमित्त ३० मार्चला निघालेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामुळे झालेला हिंसाचार अद्यापही चालूच आहे. ३ एप्रिलला रात्री उशिरा हुगळी येथील रिशरा रेल्वे स्थानकाबाहेर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे रिशरा रेल्वे स्थानक बंद करण्यात आले. या घटनेनंतर हावडा-बर्डमन मार्गावर धावणार्‍या सर्व रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या. रेल्वे स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला आहे. येथे २ एप्रिलच्या सायंकाळी भाजपकडून श्रीरामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावर रिशरा या मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले होते. यात वाहनांना आग लावण्यात आली होती. या हिंसाचारात भाजपचे आमदार बिमन घोष, तसेच अनेक पोलीस घायाळ झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

(सौजन्य : News18 Rajasthan)  

हुगळी आणि आजूबाजूच्या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यासह दोन दिवसांपूर्वी हावडा येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून ५ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे.

हावडातील हिंसाचाराच्या प्रकरणी एकाला बिहारमधून अटक

हावडा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी सुमित साव (वय १९ वर्षे) याला बिहारमधील मुंगेर येथून अटक केली आहे. हावडा येथील श्रीरामनवमीच्या मिवरणुकीत सहभागी झालेल्या सुमित साव हा हातातील बंदूक हवेत भिरकवत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हिंदु युवकाने हवेत बंदूक भिरकावल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला पकडण्यासाठी बिहार गाठणारे बंगालचे पोलीस बंगालमधील धर्मांधांसमोर नांगी टाकतात, हेच सत्य आहे ! – संपादक) साव याच्या अटकेनंतर बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपवर टीका करत हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे. (दंगलीचे खापर भाजपवर फोडून तृणमूल काँग्रेस स्वतःचे पाप लपवू पहात आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी  हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !