आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या कुत्र्यांविषयीच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ !

कडू यांच्या अटकेची मागणी

आमदार बच्चू कडू

गौहत्ती (आसाम) – महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचे मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्‍वानाचे मांस खातात. या श्‍वानांचा व्यापार होईल. आम्ही गौहत्तीला गेलो होतो, तेव्हा आम्हाला याविषयी माहिती मिळाली, असे विधान महाराष्ट्रातील अचलपूर येथील अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधानसभेत केले होते. यावरून आसामच्या विधानसभेत कडू यांचा निषेध करण्यात आला, तसेच आसाममधील विरोधी पक्षांच्या आमदारांनी बच्चू कडू यांच्या अटकेची मागणी केली.

आसामच्या विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचे भाषणदेखील थांबवावे लागले होते. काँग्रेसचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी ‘आसामविषयी इतके वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही राज्य सरकार शांत का ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला.

बच्चू कडू यांच्याकडून क्षमायाचना !

याविषयी बच्चू कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे, तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागतो.