बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे ८.१.२०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म-परीक्षण !

‘गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारतातील विविध राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले जाते. देवाच्या कृपेने ८.१.२०२३ या दिवशी बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. तेव्हा देवाच्या कृपेने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे माझ्या लक्षात आलेले आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील विविध घटकांचे आध्यात्मिक महत्त्व

१ अ. कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या आधी गावोगावी जाऊन विविध प्रकारे धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र-जागृती करून निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना कृतीप्रवण करणे : कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या आधी गावोगावी जाऊन हिंदूंना जागृत करून सभांना उपस्थित रहाण्यासाठी विविध प्रकारे धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र-जागृती केली होती. त्यामुळे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ हे ‘मी’च्या कोषातून बाहेर पडून धर्मतत्त्वाशी जोडले गेले अन् त्यांचा अहं व्यापक होऊन हिंदु समाजरूपी, म्हणजे धर्माच्या समष्टी रूपाशी एकरूप होऊ लागला. त्यामुळे त्यांची समष्टी साधना होऊन त्यांच्यावर धर्मरूपी ईश्वराची कृपा होऊन त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने शीघ्र्रतेने होऊ लागली. अशा प्रकारे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी प्रसार आणि प्रचार केल्यावर साधक अन् हिंदुत्वनिष्ठ यांना लाभ झाला.

१ आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी आलेल्या हिंदूंनी प्रवेशद्वारापासून सभेच्या मैदानापर्यंत जात असतांना विविध घटकांचा त्यांच्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम

१ आ १. बालकक्ष पहाणे : बालकक्षामध्ये बालसाधकांनी राजमाता जिजाऊ भोसले, भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस असे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा पेहराव केला होता. त्यांना पाहिल्यामुळे हिंदूंना भारतातील क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण होऊन त्यांचा त्याग, कर्तृत्व अन् शौर्य यांचे उदाहरण मनावर बिंबले. त्यामुळे त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

कु. मधुरा भोसले

१ आ २. पुरुषांच्या कपाळावर टिळा आणि महिलांच्या कपाळावर कुंकू लावणे : हिंदु जनजागृती समितीच्या पुरुष कार्यर्त्यांनी हिंदु पुरुषांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्यामुळे त्यांच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व जागृत होऊन त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शिवतत्त्वाची पिवळसर रंगाची ज्योत प्रज्वलित झाल्याचे जाणवले. महिला कार्यकर्त्यांनी हिंदु स्त्रियांच्या कपाळावर कुंकू लावल्यावर त्यांच्यामध्ये सुप्तावस्थेत असणारे श्री दुर्गादेवीचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्तीचे प्रतीक असणारे लालसर रंगाचे तेजस्वी वलय फिरतांना दिसले. अशा प्रकारे कुंकवाचा टिळा आणि महिलांनी गोलाकारात कुंकू लावल्यावर त्यांचे आज्ञाचक्र जागृत होऊन त्याद्वारे वातावरणातील सकारात्मक शक्तीच्या लहरी आकृष्ट होऊन त्या त्यांच्या देहात गेल्या. त्यामुळे त्यांची बुद्धी सात्त्विक होऊन त्यांना धर्माचरण करण्याची आंतरिक प्रेरणा मिळाली.

१ आ ३. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने पहाणे आणि विकत घेणे : मैदानावर आलेल्या हिंदूंनी प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवलेली सनातन-निर्मित कुंकू, कापूर, उटणे, उदबत्त्या यांसारखी सात्त्विक उत्पादने पाहिली. या उत्पादनांतून प्रक्षेपित झालेल्या पृथ्वी, आप, तेज आणि वायू या ४ तत्त्वांच्या स्तरावर प्रक्षेपित होणारी सात्त्विक शक्ती अन् चैतन्य यांच्या लहरींमुळे सभेच्या ठिकाणी आलेल्या हिंदूंच्या स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह या पाचही देहांची शुद्धी होऊ लागली. त्यामुळे त्यांना सभेच्या ठिकाणी कार्यरत झालेली धर्मशक्ती, धर्मतेज आणि चैतन्य यांच्या लहरी सहजरित्या ग्रहण करता आल्या. त्याचप्रमाणे हिंदूंनी ही उत्पादने घरी नेल्यामुळे घरातील वातावरणाचीही शुद्धी होऊन तेथे चैतन्य कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्या वास्तूभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते.

१ आ ४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी प्रकाशित केलेले ग्रंथप्रदर्शन पहाणे : या ग्रंथांमध्ये धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र विशद केल्यामुळे त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात ज्ञानशक्ती कार्यरत झाली होती. ग्रंथातून प्रक्षेपित झालेल्या धर्मशक्ती आणि ज्ञानशक्ती यांच्या लहरींमुळे हिंदूंच्या सूक्ष्म देहांची पुष्कळ प्रमाणात शुद्धी होऊन त्यांच्या अंतर्मनावर धर्माचरण, धर्मरक्षण आणि साधना यांचे महत्त्व बिंबले गेले. ज्या जिज्ञासूंनी हे ग्रंथ विकत घेतले, त्यांच्या सूक्ष्म देहांची अधिक प्रमाणात शुद्धी झाल्याने त्यांच्याकडून ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे धर्माचरण आणि साधना यांची प्रत्यक्ष कृती होऊन त्यांच्याभोवती धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचे चैतन्यदायी संरक्षककवच निर्माण झाले.

२. सभेतील घटनाक्रम आणि वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे आध्यात्मिक महत्त्व (टक्के) अन् आध्यात्मिक लाभाचे स्वरूप  

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२३)

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/650146.html