(म्हणे) ‘मुंबई केंद्रशासित करा !’

कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन्. अश्‍वथ्य नारायण यांची मागणी !

मुंबईत २० टक्के कानडी रहात असल्याचाही दावा !

कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन्. अश्‍वथ्य नारायण

बेंगळुरू (कर्नाटक) – मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्‍वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली. ‘सीमाप्रश्‍नाचे सूत्र उद्धव ठाकरे आणि इतर उकरून काढत आहेत’, असा आरोपही अश्‍वथ्य नारायण यांनी केला.

उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्‍वथ्य नारायण म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये मराठी लोक आता किती आहेत ?’, असे विचारले, तर अडचणीचे ठरू शकते; मात्र मुंबईत तब्बल २० टक्के कानडी लोक आहेत. तुम्हाला करायचे असेल, तर आम्ही मुंबई केंद्रशासित करा. महाराष्ट्राने महाजन आयोगाच्या शिफारसी फेटाळल्यात. त्यामुळे तो प्रश्‍न निकाली निघाला. तुमचा दावा सर्वोच्च न्यायालयातही टिकणार नाही. आता हा प्रश्‍न सोडवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. कर्नाटकी जनता शांतताप्रिय आहे. आम्ही महाराष्ट्रातील कानडी लोकांना फूस लावत नाही.’’

कर्नाटकचे मंत्री मूर्ख ! – संजय राऊत

संजय राऊत

‘मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा’, अशी मागणी करणारे कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी. एन. अश्‍वथ्य नारायण मूर्ख आहेत, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत म्हणाले, ‘‘सीमाभागात गेल्या ७५ वर्षांपासून मराठी बांधवांवर अत्याचार चालू आहेत. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. येथे सारा देश एकवटला आहे. मुंबईत बिहारी, गुजराती, बंगाली असे सगळ्या राज्यांतील लोक गुण्यागोविंदाने रहातात; मात्र सीमाभागात तसे होत नाही. आधी सीमाभाग केंद्रशासित होईल.’’