‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणार्‍या महानगरपालिकेचे स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष !

तुर्भे येथे ठिकठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य !

रस्त्यावर पडलेला कचर्‍याचा ढीग

नवी मुंबई, २० डिसेंबर (वार्ता.) – महानगरपालिकेने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ आयोजित केली होती; मात्र शहरातील अनेक ठिकाणच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते.

१. तुर्भे सेक्टर २१ येथील ट्रान्सफॉर्मसमोरील रस्त्यावर असणर्‍या२ कचराकुंड्यांमध्ये पुष्कळ कचरा साठून तो बाहेरही पडलेला आहे.

२. तुर्भे गावात येणार्‍या रस्त्यावरही कचर्‍याचा ढीग असतो. कामावर जाणारे रहिवासी तेथे कचर्‍याने भरलेल्या पिशव्या टाकून जातात.

३. ए.पी.एम्.सी. मार्केटजवळील वाहतूक पोलीस चौकीमागील नाल्यालगत ३६५ दिवस कचरा दिसून येतो. नालेही कचर्‍याने तुंबलेले असतात. गॅरेजवाले वाहन दुरुस्ती करून कचरा तेथेच टाकतात. कांदे-बटाटे विक्रेते सडलेला माल नाल्यांमध्ये टाकतात.

४. परिसरातील सायकल ट्रॅकवरही विविध प्रकारचा कचरा पडलेला असतो. कचरा टाकल्याने दुर्गंधी निर्माण होते.

५. ए.पी.एम्.सी. फळ आणि भाजी मार्केट येथेही अस्वच्छता आहे. मॅरेथॉनमध्ये ३ सहस्र २५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. (केवळ मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन नव्हे, तर शहर कचरामुक्त होण्यासाठी या सहस्रो नागरिकांनी कृतीशील योगदान द्यायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

कचर्‍याचे ढीग साठलेले असणार्‍या नवी मुंबईने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ घेणे हास्यास्पद !