परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेला आनंदाने आणि विनामूल्य सहकार्य करणार्‍या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती !

‘काही सेवांच्या अनुषंगाने आम्हाला समाजातील काही व्यक्तींची भेट घ्यावी लागली. तेव्हा ‘देवाने अशा व्यक्तींची निवड आधीच करून ठेवली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजातील व्यक्तींना आधीच सेवेसाठी सिद्ध करून ठेवले आहे. आपण केवळ त्यांच्यापर्यंत पोचायचे आहे’, असे आमच्या लक्षात आले. देवाच्या कृपेनेच आम्हाला समाजातील काही चांगल्या व्यक्तींची माहिती समजते. ओळख नसतांनाही ‘आम्ही सनातन संस्थेकडून आलो आहोत’, असे सांगितल्यावर ती व्यक्ती आनंदाने आणि उत्साहाने साहाय्य करते. अशा प्रतिष्ठितांशी संवाद साधतांना ‘आपण त्यांना प्रथमच भेटत आहोत’, असे न वाटता ‘अनेक दिवसांपासून त्यांची ओळख आहे’, असे वाटते. अशा काही मान्यवर व्यक्तींनी सनातन संस्थेला केलेले साहाय्य आणि सनातनविषयी त्यांनी काढलेले उद्गार पुढे दिले आहेत.

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१. सनातन संस्थेला लागणारी विधीविषयक कागदपत्रे विनामूल्य सिद्ध करून देणारे आणि ‘यातून माझीही सेवा झाली’, असे सांगणारे सेवाभावी वृत्तीचे एक अधिवक्ता !

वर्ष २०२० मध्ये एका अधिवक्त्यांनी संस्थेला आवश्यक असणारी विधीविषयक (कायदेविषयक) सर्व कागदपत्रे सिद्ध करून दिली. कागदपत्रे दिल्यावर त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्हाला अपेक्षित असे झाले आहे ना ?’’ आम्हाला त्यात काही सुधारणा करून हव्या होत्या. त्या करून देतांना त्यांनी विचारले, ‘‘तुमच्या विश्वस्तांना हव्या आहेत, त्याप्रमाणे सुधारणा होत आहेत ना ?’’ ते त्यातील जाणकार असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत होते. त्यांनी कोणतेही शुल्क न घेता सर्व साहाय्य केले.

ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था एवढे चांगले कार्य करत आहे. या कार्यात माझीही सेवा झाली. ‘तुम्हाला अपेक्षित असे सर्व झाले’, यातच मला समाधान आहे.’’

सौ. तनुजा गाडगीळ

२. सनातन संस्थेचे कार्य आवडल्याने कराच्या (‘टॅक्स’च्या) संदर्भात येणार्‍या अडचणींत सहजतेने साहाय्य करणारे एका जिल्ह्यातील अधिवक्ता आणि कर सल्लागार !

एका जिल्ह्यातील एक अधिवक्ता आणि कर सल्लागार वर्ष २०२० पासून सनातन संस्थेला कराच्या (टॅक्सच्या) संदर्भात आवश्यक असणारे मार्गदर्शन करतात. एका सनदी लेखपालांच्या (‘चार्टर्ड अकाऊंटंट’च्या) माध्यमातून आमची त्यांच्याशी ओळख झाली. तेव्हापासून कराच्या संदर्भात कोणतीही अडचण विचारल्यावर ते लगेच मार्गदर्शन करतात. सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत मी सनातन संस्थेविषयी केवळ दूरचित्रवाणीवरच ऐकले होते; परंतु खरे कार्य मला आता ठाऊक झाले.’’ त्यांना संस्थेचे कार्य आवडले असून ते म्हणाले, ‘‘तुमच्या कार्याला लागेल, ते साहाय्य मी कधीही करीन !’’

प्रतिष्ठित असूनही त्यांच्या बोलण्यात नेहमी नम्रता आणि सहजता असते. त्यामुळे आम्हाला त्यांना कोणतीही समस्या सहजतेने विचारता येते आणि तेही सहजतेने उत्तरे देतात. एखाद्या विषयासंबंधी त्यांना ठाऊक नसेल, तर ते त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींना आम्हाला जोडून देतात.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘सनातन संस्थे’चे केवळ नाव ऐकूनच अनोळखी व्यक्तींनीही साहाय्य करणे

खरेतर समाजामध्ये व्यावसायिकता पुष्कळ वाढलेली असल्याने या क्षेत्रातील व्यक्तींची भेट होण्याआधीच त्यांचे शुल्क देण्याविषयीचे बोलणे होते. तेवढे शुल्क देण्याचे ठरल्यानंतर त्यांना भेटता येते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘सनातन संस्थे’चे केवळ नाव सांगितल्यावर अनोळखी व्यक्तीही लगेच साहाय्य करतात. यातून ‘सनातन संस्था’ या नावात किती चैतन्य आणि सामर्थ्य आहे ?’, हे लक्षात आले.

देवाच्या कृपेने आम्हाला हे सर्व अनुभवता आले. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– पू. रत्नमाला दळवी आणि सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१०.२०२१)