राजस्थानच्या काँग्रेसी मंत्र्याने राहुल गांधी यांच्या पदयात्रेवरून प्रभु श्रीरामाशी केली तुलना !

जयपूर (राजस्थान) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ या नावाने काढलेल्या पदयात्रेवरून राजस्थानचे काँग्रेसचे मंत्री परसादी लाल मीना यांनी गांधी यांची तुलना प्रभु श्रीरामचंद्र यांच्याशी केली आहे. ते म्हणाले की, राहुल गाधी यांची पदयात्रा ऐतिहासिक असणार आहे. प्रभु श्रीरामही श्रीलंकेपर्यंत पायी गेले होते. गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असे त्यापेक्षाही अधिक अंतर चालणार आहेत. आतापर्यंत असा प्रवास कुणीही केलेला नाही. देशाला पालटण्यासाठी आणि धर्मांधतेला संपवण्यासाठी राहुल गांधी यांची ही यात्रा आहे, असेही मीना म्हणाले.

मीना यांच्या या विधानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी सध्या पदयात्रा करत आहेत. गांधी यांची प्रभु श्रीराम यांच्याशी तुलना करण्यात आलेली नाही. प्रभु श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावात आरंभी ‘रा’ हे अक्षर येते. हा योगायोग म्हणता येईल; मात्र आम्ही रामजी आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाही. राहुल गांधी मनुष्य आहेत. प्रभु राम हे देव आहेत.

संपादकीय भूमिका

एरव्ही प्रभु श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणार्‍या हिंदुद्रोही काँग्रेसचा कपटी आणि दुटप्पी चेहरा कसा आहे, हे लक्षात घ्या ! अशा काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत, हे तिने विसरू नये !