भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – भारत सरकारची टीका

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण

नवी देहली – जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल भुकेचे योग्य मूल्यमापन करत नाही. अहवालासाठी चुकीची पद्धत अवलंबली जात आहे, अशी टीका केंद्र सरकारने केली आहे. ‘भारत हा त्याच्या नागरिकांना पुरेसे आणि सकस अन्न पुरवू शकत नाही,’ हे दाखवून देशाची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे’, असेही भारताने म्हटले आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने या संदर्भात निवेदन जारी केले असून देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी पावले उचलली गेल्याचे म्हटले आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचे स्थान १०१ वरून १०७ वर आल्याचे म्हटले आहे. यात भारत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापेक्षाही खाली गेल्याचे म्हटले आहे. त्यावरून भारताने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

१. सरकारने म्हटले की, अहवाल सत्य परिस्थितीशी जोडलेला नाही. भारताने अन्न सुरक्षेसाठी, त्यातही विशेषकरून कोविड काळात केलेल्या कामांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अहवालासाठी वापरण्यात आलेले ४ पैकी ३ निर्देशांक मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत आणि ते संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधी असू शकत नाहीत.

२. सरकारने म्हटले की, अहवालासाठी सहभागी करून घेण्यात आलेल्या लोकसंख्येवरही केंद्र सरकारने प्रश्‍चचिन्ह उपस्थित केले आहे. कुपोषित लोकसंख्येचे चौथे आणि सर्वांत महत्त्वाचे सूचक ठरवण्यासाठी केवळ ३ सहस्र लोकांना समाविष्ट करुन घेण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांत सर्वेक्षण करणार्‍या विविध संघटना भारतद्वेष्ट्या आहेत, हे आतापर्यंत बर्‍याच वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे अशांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !