चीन सागरातील नोरू चक्रीवादळामुळे भारतातील २० राज्यांत जोरदार पावसाची शक्यता !

नवी देहली – चीन सागरामध्ये आलेल्या ‘नोरू’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे वादळी वारे वहात आहे. त्यामुळे आर्द्रता वाढल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम रहाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाविषयी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. म्हणजेच मेघगर्जनेसमवेत जोरदार वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.