खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

चंडीगढ – पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संस्थेच्या साहाय्याने ‘सिख फॉर जस्टिस’चा आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू हा खलिस्तानी फुटीरवाद पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात आहे. तो शीख युवकांना खलिस्तानी झेंडा फडकावण्यासाठी भडकवत होता; मात्र पंजाबच्या लोकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पन्नू याच्या पंजाबमधील अमृतसर येथील घरावर तिरंगा ध्वज फडकावला.

खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू

पन्नू याच्या देशविरोधी कारवायांमुळे भारत सरकारने २०१९ मध्ये त्याच्या ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेवर बंदी घातली. भारताला हवा असलेल्या आतंकवाद्यांच्या सूचित पन्नूचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पन्नूने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केला होता, तसेच त्याने खलिस्तानी झेंडा फडकावणार्‍यांना बक्षीसही घोषित केले  होते. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये पन्नू याने ‘हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना १५ ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही’, अशी धमकी दिली होती. या व्हिडिओमधील संदेशात म्हटले होते की, पंजाबनंतर तो हिमाचल प्रदेशही कह्यात घेणार आहे; कारण हिमाचलचा काही भाग पूर्वी पंजाबचा भाग होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता.

मे २०२२ मध्ये पन्नू याने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या शिक्षेच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. यासीन मलिक याचा ‘प्रतिष्ठित नेता’ असा उल्लेख करून त्याने मुसलमानांना त्याच्या शिक्षेच्या निषेधार्थ अमरनाथ यात्रा रोखण्याचे आवाहन केले होते.

कोण आहे गुरपतवंत सिंह पन्नू ?

पंजाबच्या अमृतसरमधील खानकोट गावात गुरपतवंत सिंह पन्नू याचे वडिलोपार्जित घर आहे. पन्नूचा जन्म याच गावात झाला. पुढे तो विदेशात गेला. पन्नूचे वडील महिंदर सिंह हे फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून खानकोटला आले होते. पन्नू त्याचा भाऊ मंगवंत सिंह याच्यासमवेत विदेशात स्थायिक झाला. पुढे तो अमेरिकेत गेला. तेथे त्याने ‘सिख फॉर जस्टिस’ या नावाने फुटीरतावादी खलिस्तानवादी संघटना स्थापन केली. या माध्यमातून त्याने भारतातील तरुणांना खलिस्तानसाठी चिथवण्याचे काम चालू केले.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !