नेहरू-गांधी यांच्या नावावर आम्ही ‘३-४ पिढ्या बसून खातील’ एवढे कमावले !

  • कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के.आर्. रमेश कुमार यांच्या काँग्रेसच्या पापाला समर्थन !

  • ‘ईडी’कडून सोनिया गांधी यांच्या झालेल्या चौकशीच्या विरोधात बेंगळुरूत आंदोलन !

के.आर्. रमेश कुमार

बेंगळुरू – आम्ही नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर एवढी संपत्ती कमावली आहे की, आमच्या पुढील ३-४ पिढ्यांना ती पुरेल ! आम्ही त्यांच्यामुळेच सत्ता अनुभवली. आज आम्ही बलीदान दिले नाही, तर भविष्यात आम्ही कमावलेले सडून जाईल. आपण सर्वांनी आता गांधी कुटुंबाचे ऋण फेडायचे आहे, असे वक्तव्य येथील काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के.आर्. रमेश कुमार यांनी केले.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी चालू असल्याच्या विरोधात काँग्रेसने येथे २१ जुलै या दिवशी केलेल्या आंदोलनाच्या वेळी कुमार बोलत होते. या वेळी आंदोलनामध्ये काँग्रेसचे कर्नाटकातील वरिष्ठ नेते डी.के. शिवकुमार, विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

सौजन्य : newsofindia

१. कुमार पुढे म्हणाले की, देश आणि काँग्रेस वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सोनिया गांधी यांना नैतिक पाठिंबा दिला पाहिजे. असे केले, तरच आपण दोन्ही वेळा ग्रहण करत असलेल्या अन्नाचे सार्थक होईल.

२. भाजपकडून आधीच काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असतांना आता कुमार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एका प्रकरणासंबंधी रमेश कुमार म्हणाले होते, ‘एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार होणारच असतो, तेव्हा झोपा आणि त्याचा आनंद घ्या !’ (अशी वक्तव्ये करूनही ‘कुमार यांना बडतर्फ केले जात नाही’, यातून काँग्रेसकडून कुमार यांच्या वक्तव्यांना अप्रत्यक्ष समर्थनच आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक) यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

संपादकीय भूमिका

यातून काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला किती प्रमाणात लुबाडले, हे लक्षात येते ! या पापांमुळेच काँग्रेस देशाच्या राजकारणातून लवकरच पुसली जाईल, हे सुनिश्‍चित आहे !