‘मोबाईल गेम’ खेळण्यास विरोध केल्याने मुलाकडून आईची हत्या !

हत्येच्या २ दिवस आधी आईने मुलाला बेदम मारहाण केल्याची पोलिसांची माहिती

लक्ष्मणपुरी – ‘पबजी’ हा ऑनलाईन खेळ खेळू न दिल्याने संतापलेल्या १६ वर्षांच्या मुलाने त्याच्या आईवर ६ गोळ्या झाडून तिला ठार केले. त्यानंतर तो ३ दिवस आईच्या मृतदेहासमवेत घरातच राहिला. १० वर्षांच्या बहिणीलाही त्याने धमकाले होते. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली, तेव्हा सैन्यात अधिकारी असलेल्या वडिलांना स्वत: ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याने आईची हत्या केल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार कळल्यानंतर वडिलांनी नातेवाईक आणि पोलीस यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कुजलेला मृतदेह बाहेर काढला.

१. नवीनकुमार सिंह हे मूळचे वाराणसीचे असून ते सैन्यामध्ये कनिष्ठ अधिकारी आहेत. ते सध्या बंगालमध्ये कार्यरत आहेत. लक्ष्मणपुरीच्या पीजीआय भागातील यमुनापूरम् कॉलनीत त्यांचे घर आहे. येथे त्यांची पत्नी साधना (४० वर्षे) त्यांचा १६ वर्षीय मुलगा आणि १० वर्षांच्या मुलीसमवेत रहात होती.

२. पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मुलाला भ्रमणभाषवर गेम खेळण्याची सवय होती; मात्र आई त्याला गेम खेळण्यापासून रोखत असे.

३. ४ जून या दिवशीही आईने त्याला रोखल्याने संतापून त्याने रात्री २ वाजता त्याच्या वडिलांची बंदूक घेऊन झोपलेल्या आईची हत्या केली.

आई मुलाला पुष्कळ त्रास देत असे ! – पोलीस

दुसरीकडे साधना त्याच्या मुलाला कशाचा तरी राग मनात धरून त्रास देत होत्या, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर मासामध्ये मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या रात्री मुलाने आईची तक्रार वडिलांकडे केली होती. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. तेव्हापासून साधना त्याच्या मुलाचा सतत छळ करत होत्या. साधना यांनी घटनेच्या २ दिवस आधी मुलावर १० सहस्र रुपये चोरल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली होती. तेव्हाच त्याने आईला मारण्याचा विचार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुलाला आईच्या काही सवयींचा तिटकारा आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्याने वडिलांकडे अनेकदा तक्रारही केली. असे असूनही आईच्या वागण्यात काही पालट झाला नाही. या सर्वांना कंटाळून तो वर्षभरापूर्वी घरातून पळून गेला होता. हे प्रकरण काय होते, यासंदर्भात पोलिसांनी काहीही सांगितले नाही. सध्या पोलिसांनी मुलाला त्यांच्या संरक्षणात घेऊन १० वर्षांच्या मुलीला नवीन यांच्या भावाकडे सोपवले आहे.

संपादकीय भूमिका

निधर्मी शिक्षणपद्धत स्वीकारल्यानेच समाजाची दुरवस्था झाल्याचे हे उदाहरण होय ! पालकांनी स्वत: साधना करून त्यांच्या पाल्यांकडूनही ती करवून घेतल्यास अशा घटना घडणार नाहीत, हे लक्षात घ्या !