ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ अन् ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

२६.२.२०२२ या दिवशी ‘ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांपैकी ‘शुद्ध ‘म’ (टीप १) अन् ‘तीव्र ‘म’ (टीप २) या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रयोग करण्यात आले. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

टीप १ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच (त्यांच्या मूळ कंपनस्थानी (frequency ला)) असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’, असे म्हणतात.

टीप २ – जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक कंपनस्थितीला जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प कंपनसंख्येला असतो, त्याला ‘तीव्र स्वर’, असे म्हणतात, उदा. सा, रे, ग, म(शुद्ध), म(तीव्र), प – याप्रकारे स्वरमालिकेत तीव्र ‘म’ हा स्वर शुद्ध ‘म’ स्वरापेक्षा अधिक कंपनस्थितीला आहे; परंतु ‘प’ या स्वरापेक्षा अल्प कंपनसंख्येला आहे.

१. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ आणि ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

श्री. प्रदीप चिटणीस

१ अ. ‘शुद्ध ‘म’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

१ अ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. साधकांना या स्वरात शक्तीच्या स्पंदनांचे प्रमाण सौम्य जाणवले.

आ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना स्वरात शांतता आणि स्थिरता जाणवली.

इ. कु. ज्योत्स्ना गांधी यांना आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांवर स्वराची स्पंदने जाणवली.

१ अ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढली.

१ आ. ‘तीव्र ‘म’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

१ आ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. श्री. अनिल सामंत आणि प्रयोगात सहभागी झालेले इतर साधक यांना या स्वरात शुद्ध ‘म’पेक्षा अधिक पटींनी उष्णता अन् शक्ती जाणवली.

आ. ‘या स्वरातून मारक तत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले.

इ. साधकांचे ध्यान लागले.

१ आ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीहून अधिक वाढली.

२. श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ आणि ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

२ अ. ‘शुद्ध ‘म’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

२ अ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. प्रारंभी साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींनी सूक्ष्मातून बडबड केली; परंतु श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘शुद्ध ‘म’ स्वर गायला चालू केल्यानंतर १० मिनिटांनी वाईट शक्तींची बडबड पूर्णपणे थांबली. प्रयोग संपेपर्यंत ‘शुद्ध ‘म’ या स्वरामुळे चैतन्य मिळाल्याने साधकांतील वाईट शक्ती न्यून झाली. या वेळी साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून ध्यान लावून लढत होत्या.

आ. या स्वराचे गायन संपल्यावर ४५ मिनिटांनी साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून जागृतावस्थेत आल्या. एरव्ही गायन संपल्यावर वाईट शक्ती वातावरणातील सकारात्मक ऊर्जा न्यून करण्यासाठी सूक्ष्मातून ‘अनावश्यक बडबड करणे, गाणी म्हणणे, मोठ्याने बोलणे’, अशा कृती करतात.

२ अ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीहून अधिक वाढली.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२ आ. ‘तीव्र ‘म’ या स्वराचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

२ आ १. साधकांना जाणवलेली सूत्रे

अ. श्री. प्रदीप चिटणीस ‘तीव्र ‘म’ हा स्वर म्हणत असतांना या स्वरातील सात्त्विकता सहन न झाल्याने एका साधिकेला त्रास देणाऱ्या वाईट शक्तीने सूक्ष्मातून ‘जाम, जाम’, ‘ना, ना’ (‘नको’ या अर्थी), असे म्हणणे, रडवेला तोंडवळा करून ‘म’ म्हणणे’ आदी कृती केल्या. ‘तिला या स्वरातील चैतन्य सहन होत नव्हते’, हे तिच्या कृतींवरून लक्षात येत होते.

आ. ‘तीव्र ‘म’ या स्वरात असलेल्या मारक शक्तीमुळे साधकांना काहीच करता येत नव्हते’, असे जाणवले. काही कालावधीतच सगळे साधक शांत झाले.

२ आ २. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ४ पटींनी वाढली.

३. निष्कर्ष

मंत्रामध्ये अधिक शब्द असतात. त्या तुलनेत नामजपात अल्प शब्द असतात, तर बीजमंत्रात केवळ एखादाच शब्द असतो. ‘जेवढे सूक्ष्म, तेवढे शक्तीशाली’ असे शास्त्र आहे. त्यामुळे बीजमंत्रात सर्वाधिक शक्ती आहे. या ठिकाणी श्री. चिटणीस यांनी केवळ एकच स्वर म्हटला. त्यामुळे वरील तत्त्वाप्रमाणे ‘अनेक स्वर म्हणण्यापेक्षा एक स्वर म्हणण्याचा परिणाम अधिक पटींनी होतो’, हे या प्रयोगातून शिकायला मिळाले. ‘म’ हा स्वर आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने साधकांना या प्रयोगाच्या वेळी सूक्ष्मातून ध्यान लावून लढावे लागत होते, तर ‘तीव्र ‘म’ या स्वरात मारकता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर मोठ्या प्रमाणात उपाय झाले. त्यामुळेच त्यांची सकारात्मक ऊर्जा ४ पटींनी वाढली. ऋषिमुनींनी परिपूर्ण शास्त्र लिहून ठेवून संपूर्ण मानवजातीवर उपकार केले आहेत.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.२.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक