चारधाम यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाची पडताळणी होणार !

चारधाम यात्रेमध्ये अहिंदूंना प्रवेश नाकारण्याच्या संतांच्या मागणीमुळे उत्तराखंड सरकारचा निर्णय

संतांनी सांगितल्यानंतर निर्णय घेणार्‍या उत्तराखंड सरकारचे अभिनंदन ! हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र जिहादी आतंकवादी रचतात. हे लक्षात घेऊन सरकारने असामाजिक घटक यात्रेकरूंमध्ये मिसळून समाजविघातक कार्य करू नयेत, यासाठी स्वतःहून पावले उचलणे अपेक्षित आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक 

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (डावीकडे)

डेहराडून (उत्तराखंड) – चारधामची यात्रा करणार्‍या प्रत्येक यात्रेकरूची पडताळणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली. ‘या यात्रेसाठी येणार्‍या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी संतांनी ‘चारधाम यात्रेमध्ये अहिंदूंना प्रवेश नाकारण्यात यावा’, अशी मागणी केली होती. राज्यात येणार्‍या अहिंदूंना ओळखण्यासाठी त्यांना परवाना किंवा ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात अला आहे.  येत्या ३ मे पासून चारधाम यात्रा प्रारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री धामी म्हणाले की, आमचे राज्य शांत राहिले पाहिजे. आमचा धर्म आणि संस्कृती वाचली पाहिजे. यासाठी सरकारी पातळीवर या यात्रेसाठी येणार्‍या प्रत्येकाची पडताळणी करण्यात येणार आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीमुळे राज्यातील स्थिती वाईट होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहोत.