अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार ! – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणाचे प्रकरण

आमदार डॉ. अशोक उईके (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डॉ. (सौ.) भारती हेडाऊ आणि श्री. प्रशांत सोळंके

यवतमाळ, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – गड-दुर्गांवर होणार्‍या अतिक्रमणाविषयी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय उपस्थित करू, असे आश्वासन भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिले. याविषयी ‘स्वतः राज्यपालांनाही पत्र पाठवू’, असेही त्यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गड-दुर्गांवरील अतिक्रमणांच्या संदर्भात त्यांना डॉ. (सौ.) भारती हेडाऊ आणि श्री. प्रशांत सोळंके यांनी त्यांना निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे कौतुकही त्यांनी या वेळी केले.

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी गडांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटवण्यासंदर्भात येथील राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांना वरील निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील गडांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. ज्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे घडले त्यांच्यावर आणि ज्या धर्मांधांनी ही अतिक्रमणे केली, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या संदर्भात अनेक दुर्गप्रेमी, तसेच शिवप्रेमी संघटनांनी आवाज उठवला आहे. याची गंभीर नोंद घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चौकशी आरंभ करावी, अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून दुर्गांचे संवर्धन करण्यात यावे, अशी भावना दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

येत्या अधिवेशनात ‘औचित्त्याचे सूत्र’ म्हणून सूत्र उपस्थित करणार ! – संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार, भाजप    

चर्चा करतांना डावीकडून लोभेश्वर टोंगे, मध्यभागी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि लहू खामणकर

वणी (यवतमाळ), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची हिंदु जनजागृती समितीकडून भेट घेण्यात आली. भेटीत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमणाविषयीचे सूत्र सांगितले. संपूर्ण विषय समजून घेतला. याविषयी ‘येत्या अधिवेशनात  ‘औचित्याचे सूत्र’ म्हणून सूत्र उपस्थित करू’, असे आश्वासन त्यांनी सांगितले.