पूर्व विदर्भात डेंग्यू आजारामुळे वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक मृत्यू वर्ष २०२१ मध्ये !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ६ जिल्ह्यांत वर्ष २०२१ मध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसीसनंतर डेंग्यूचाही उद्रेक झाला. वर्ष २०१४ नंतर येथे वर्ष २०२१ या वर्षी सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण नोंदवले गेले. वर्ष २०२१ या वर्षी सर्वाधिक ३ सहस्र ६२८ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून २४ डेंग्यूग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २०१४ मध्ये डेंग्यूचे २ सहस्र ९६ रुग्ण आढळले होते. यांपैकी उपचाराच्या वेळी ४३ रुग्ण दगावले होते.

आरोग्य विभागाने डेंग्यूची ही रुग्णसंख्या आणि मृत्यू पहाता या भागांत डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपाय केले. त्यामुळे वर्ष २०१५ मध्ये येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४१४ इतकी खाली आली. उपचाराच्या वेळी ३ रुग्ण दगावले. वर्ष २०१६ मध्ये ही रुग्णसंख्या आणखी खाली म्हणजे २९१ रुग्णांवर आली. एका रुग्णाचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भात वर्ष २०१७ मध्ये ३२१ रुग्ण आढळले, ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र १९९ रुग्ण आढळले, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. वर्ष २०१९ मध्ये येथे १ सहस्र ३१६ रुग्ण आढळले. यामध्ये ११ रुग्ण दगावले. वर्ष २०२० मध्ये ५०३ रुग्ण आढळले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. मार्च २०२० पासून पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप चालू झाला. त्यामुळे कीटकजन्य आजाराशी संबंधित विभागातील कर्मचार्‍यांच्या सेवाही कोरोनाशी संबंधित कामात लावल्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे वर्ष २०२१ मध्ये डेंग्यूचा उद्रेक झाला.