भारतात विविध प्रकारे नासाडी होणारे ३० टक्के धान्य वाचवण्याचा विचार करायला हवा !

धान्य गोदाम

‘संपूर्ण जगामध्ये अन्नधान्य उत्पादन आणि त्याची नासाडी चालू आहे. भारतामध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शेतात पिकणारे धान्य वेगवेगळ्या गोदामांत साठवले जाते; परंतु आज भारताची धान्य साठवण्याची क्षमता न्यून आहे. अनेक ठिकाणी धान्य गोदामाबाहेरही साठवले जाते. पाऊस, वादळ, वारा आणि कडक ऊन यांमुळे त्यातील ३० टक्के धान्य खराब होते. मोठ्या पावसामुळे ते कुजून जाते. इतर अन्नधान्य उंदीर आणि घुशी खाऊन टाकतात. तसेच काही प्रमाणात धान्य वाहतुकीत नष्ट होते. असा मोठा गलथान कारभार वाहतूक आणि साठवण या प्रक्रियांमधून होतो. खरे पहाता येणारे धान्य साठवण्याची क्षमता नसतांना ते का खरेदी केले जाते ? यासाठी अधिक मोठी गोदामे उभी रहाणे आवश्यक आहे. गोदामांचा साठा किमान ३० टक्के वाढला पाहिजे.

शिजलेल्या अन्नाच्या नासाडीमुळेही शेतकर्‍यांची हानीच !

अन्नाची नासाडी

अन्न शिजल्यानंतर त्याचे योग्य त्या प्रमाणात वितरण झाले पाहिजे. मोठमोठे ‘शाही’ समारंभ आणि विवाह होतात तेथे अन् उपाहारगृहांमध्येही अन्नाची नासाडी अधिक होते. अधिक प्रमाणात अन्न शिजवल्यामुळे ते कचराकुंडीत फेकावे लागते. या सर्वांचे नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे, तरच शेतकर्‍यांना योग्यभाव मिळेल आणि अन्नधान्याचा उपयोगही चांगला होईल. नाश पावणारे अन्न वाचवलेच पाहिजे !’

(देशात अशा प्रकारे वाया जाणार्‍या धान्याविषयी हिंदूंच्या सणांच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पुरो(अधो)गामी काही बोलतील का ? कि नेहमीप्रमाणे गप्प बसतील ? अन्नधान्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन आणि विनियोग होण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)  

– अनिल पाटील ( साभार : ‘लोकजागर’, नोव्हेंबर २०१७)