प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करतांना तिथे आनंद आणि चैतन्य जाणवणे अन् सेवा संपल्यावर तिथे ‘राम’ हा शब्द उमटणे

प.पू. दास महाराज

१. प्रथम भेटीतच प्रीतीचा वर्षाव करणारे प.पू. दास महाराज !

‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे जवळ जवळ १७ – १८ वर्षे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे (जिल्हा सिंधुदुर्ग) आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

सौ. मांडवी भरत बुगडे

२. सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा चालू असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होणे आणि गुरुस्मरण करत ही सेवा केल्यावर तिथे उमटलेला ‘राम’ हा शब्द पाहून भावजागृती होणे

सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करत असतांना मला पुष्कळ आनंद आणि वातावरणात चैतन्य जाणवत होते. येथे बाहेर पुष्कळ शेवाळे आले होते. मी ते स्वच्छ करतांना ‘जो जाण्या-येण्याच्या वाटेवरचा भाग आहे, तेथील शेवाळे आधी घासून काढूया’, असा विचार करून मी तिथून घासायला चालू केले. तेव्हा आपोआपच माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू झाला. ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले होते, ‘आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू, तेव्हा आपण आपल्या गुरुदेवांचे स्मरण करत आहोत’, असा भाव ठेवावा. तसा नामजप करत मी ते शेवाळे खरवडून काढतांना ते सहजतेने खरवडले गेले. संध्याकाळ झाल्यावर आम्ही ती सेवा थांबवली. तेव्हा त्या जागेवर ‘राम’ हा शब्द उमटला होता. मी हे पाहिल्यावर माझे मन पुष्कळ कृतज्ञतेने भरून आले. ‘येथे रामतत्त्व भरून राहिले आहे. गुरुदेवच येथे आहेत’, अशीही मला जाणीव होत आहे.’

– सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल (१८.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक