‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांचा केलेला तुलनात्मक अभ्यास

आतापर्यंत आपण ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप करतांना साधकांना आलेल्या अनुभूती अन् त्याचे विश्लेषण वाचले. आज आपण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांचा केलेला तुलनात्मक अभ्यास येथे देत आहोत.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप करण्याचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप अखंड केले, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’


संत आणि साधक यांना मिळालेले सूक्ष्म ज्ञान आणि साधकांना आलेल्या अनुभूती यांतील साम्य !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप केल्यावर काय अनुभूती येतात, याची माहिती सद्गुरु गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे चांगल्या अनुभूती बहुतेक साधकांना आल्या आहेत, हे येथील लिखाणावरून लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. नामजपांतून लक्षात येणारी अनुभूतीजन्य वैशिष्ट्ये, त्यांचे प्रमाण, प्राप्त होणार्‍या निर्विचार स्थितीचे प्रमाण आणि नामजपाची कृतीशीलता

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांमध्ये ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाची शांतीची स्पंदने सर्वांत अल्प (१० टक्के), तर ‘ॐ निर्विचार’ या नामजपाची स्पंदने सर्वांत जास्त (२० टक्के) आहेत. शांतीच्या स्पंदनांवरून नामजपाचा निर्गुण स्तर ठरतो. नामजपात जेवढे शब्द अल्प, तेवढा त्याचा निर्गुण स्तर वाढत जातो. ‘निर्विचार’ या नामजपात एकच शब्द आहे; पण ‘ॐ निर्विचार’ या नामजपात दोन शब्द असूनही त्याची शांतीची स्पंदने अधिक आहेत; कारण त्यामध्ये ‘ॐ’ हे निर्गुण स्तराचे अक्षर आहे. तसेच ‘निर्विचार’ हा नामजप मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर कार्य करतो, तर ‘ॐ निर्विचार’ हा नामजप अंतर्मनात कार्य करतो.

आ. आनंद मिळण्याचे प्रमाण ‘ॐ निर्विचार’ आणि ‘निर्विचार’ या नामजपांमध्ये थोडेसे अधिक आहे.

इ. ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’ या गुणांमुळे चैतन्य मिळते. ‘निर्विचार’ या नामजपात सर्वाधिक (३० टक्के) चैतन्य आहे; कारण ‘निर्विचार’ या शब्दाला अर्थ आहे आणि तो परिणाम साध्य करतो. ‘निर्विचार’ हा नामजप करायला कठीण असल्याने त्याला देवतेचे स्वरूप देऊन सोपा असा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप सिद्ध केला आहे. प्रत्यक्षात ती देवता नाही. त्यामुळे ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपामध्ये ‘निर्विचार’ या नामजपापेक्षा अल्प प्रमाणात (२० टक्के) चैतन्य आहे. ज्यांना ‘निर्विचार’ या नामजपाचा निर्गुण स्तरावरील परिणाम साध्य करायचा आहे; पण त्यांना तो नामजप करणे कठीण जात आहे, त्यांच्यासाठी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप सिद्ध केला आहे. ‘ॐ निर्विचार’ या नामजपामधील शब्दांची जोडी विसंगत वाटते. याचे कारण म्हणजे त्या दोन्ही शब्दांची स्पंदने एकमेकांशी जुळत नाहीत. ‘निर्विचार’ हा नामजप निर्गुण स्थिती येण्यासाठी आहे; परंतु त्याला ‘ॐ’ जोडल्यावर हा अतिरिक्त शब्द आणि त्या शब्दाबरोबर येणारी त्याची शक्ती, यांमुळे त्या नामजपाला जडत्व येते. या जडत्वामुळे त्याचा परिणामही न्यून होतो. थोडक्यात हा नामजप ‘निर्गुण’ टप्प्यावरून ‘निर्गुण-सगुण’ टप्प्याला येतो. त्यामुळे या नामजपामध्ये चैतन्य अल्प प्रमाणात (१० टक्के) आहे.

२. नामजपांचा असलेला सगुण-निर्गुण स्तर

३.  नामजप सहजतेने होण्यासाठी पूरक असलेली आध्यात्मिक पातळी

जशी साधकाची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसा त्याचा प्रवास सगुण स्तरावरून निर्गुण स्तराकडे होत जातो. याचा अर्थ साधक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या टप्प्यांपैकी शक्तीच्या टप्प्याकडून शांतीच्या टप्प्याकडे, म्हणजे निर्गुण स्तराकडे प्रवास करतो. त्यामुळे साधक ज्या टप्प्याला असतो, त्या टप्प्याचा नामजप करणे त्याला सुलभ जाते. येथे दिलेल्या तीन नामजपांपैकी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपामध्ये निर्गुण स्पंदने अल्प प्रमाणात असल्याने तो अल्प पातळीच्या साधकांना करणे सुलभ जाईल.

४. तिन्ही नामजपांचा झालेला सामायिक परिणाम

अ. नामजपाची स्पंदने प्रथम अनाहतचक्रावर जाणवली. ती भावाच्या स्वरूपातील होती.

आ. मूलाधारचक्रामध्ये कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती वर चढली आणि सहस्रारचक्रापर्यंत गेली. तेव्हा सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

इ. ४ – ५ सेकंदांनी पुन्हा आरंभी असलेली चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी जागृत झाली. तेव्हा नामजपाची स्पंदने अनाहतचक्रावर जाणवली. त्या वेळी कुंडलिनीशक्तीचे अस्तित्व जाणवले नाही.

ई. काही सेकंदांनी कुंडलिनीशक्ती पुन्हा जागृत होऊन ती सहस्रारचक्रापर्यंत गेली. तेव्हा पुन्हा सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. ४ – ५ सेकंदांनी अनाहतचक्रावर नामजपाची स्पंदने पुन्हा जाणवून आरंभी असलेली चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी जागृत झाली.

उ. ‘नामजपामुळे मूलाधारचक्रामध्ये कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती सहस्रारचक्रापर्यंत जाणे, काही सेकंदांनी अनाहतचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवणे (कुंडलिनीशक्तीचे अस्तित्व न जाणवणे) आणि कुंडलिनीशक्ती पुन्हा जागृत होणे’, हे चक्र नामजप ऐकतांना सतत चालू होते.

ऊ. नामजप ऐकतांना देहाचे भान हरपले आणि श्वासाची गती मंदावली. तेव्हा ‘आपला श्वास चालू नाही’, असेच वाटले.

ए. नामजप ऐकतांना मन एकाग्र झाल्याने आजूबाजूच्या आवाजांचा कोणताही परिणाम माझ्यावर झाला नाही आणि माझी एकाग्रता भंग पावली नाही.

५. नामजपाचा परिणाम होण्यामध्ये जाणवलेला भेद

५ अ. ‘नामजपामुळे कुंडलिनीशक्ती जागृत होणे, काही सेकंदांनी तिचे अस्तित्व न जाणवणे आणि ती पुन्हा जागृत होणे’ हे चक्र पूर्ण होण्यासाठी लागलेल्या नामजपांची संख्या अन् वेळ

वरील सारणीवरून लक्षात येते की, ‘निर्विचार’ या नामजपाला परिणाम साध्य करण्यासाठी सर्वांत अल्प वेळ लागला, तर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाला परिणाम साध्य होण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला. ‘अनेकातून एकात येणे’, हे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी एक तत्त्व आहे. नामजपांच्या अनेक शब्दांकडून एका शब्दाकडे आल्यास परिणाम लवकर साध्य होतो, हे यातून लक्षात येते.

६. सारांश

वरील विश्लेषणावरून लक्षात येते की, दिलेल्या ३ नामजपांपैकी ‘निर्विचार’ हा नामजप करणे अधिक योग्य आहे.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.६.२०२१)

नामजप करणार्‍यांसाठी सूचना

१. बाजूला दिलेल्या लेखामध्ये ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपांपैकी ‘निर्विचार’ हा नामजप सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे, तसेच आध्यात्मिक पातळीनुसार कोणता नामजप करणे सोयिस्कर आहे, तेही दिले आहे. साधकाच्या क्षमतेसाठी ‘आध्यात्मिक पातळी’ हा एक निकष असला, तरी भाव, तळमळ, साधनामार्ग इत्यादी अन्य निकषही लागू असतात. त्यामुळे एखाद्यासाठी पातळीनुसार एखादा नामजप लागू असला (उदा. श्री निर्विचाराय नमः ।), तरी त्याला त्याच्यातील तळमळीमुळे किंवा त्याचा ‘ज्ञानयोग’ हा साधनामार्ग असल्यास, त्याला त्याहून उच्च स्तराचा (उदा. ॐ निर्विचार) नामजपही करता येऊ शकेल.

२. त्यामुळे साधकाने प्रथम पातळीनुसार येथे दिलेला नामजप ७ दिवस करून पहावा. त्यानंतर त्याने त्याहून वरच्या स्तराचा नामजप पुढील ७ दिवस करून पहावा. असे करत त्याने तिन्ही नामजप प्रत्येकी ७ दिवस करून पहावेत. जो नामजप करणे सहज साध्य होईल, तो नामजप प्रत्येकाने करावा.

३. काही मास (महिने) स्वतःला सहज शक्य असलेला नामजप केल्यानंतर पुन्हा ‘त्याच्यावरील स्तराचा नामजप करणे स्वतःला जमते का ?’, याचा प्रयोग करावा. ‘निर्विचार’ हा नामजप सर्वश्रेष्ठ असल्याने त्या नामजपापर्यंत जाण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.६.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.