‘किल्ले राजगड उत्सवा’त ३५५ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन साजरा होणार !

पुणे महापालिका आणि ‘श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून वर्ष १६६६ मध्ये किल्ले राजगड येथे सुखरूप परतले, त्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे महानगरपालिका आणि ‘श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५५ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस मागील ४० वर्षांपासून दोन्ही संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येतो. यंदा उत्सवाचे ४१ वे वर्ष आहे. यांसह पुण्यामध्ये लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता कसबा पेठेतील लाल महाल येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे, अशी माहिती ‘श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गड जागरण, पोवाडा, व्याख्यान, सूर्योदयास ध्वजारोहण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तरी संपूर्ण उत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्यात होणार्‍या लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार गिरीश बापट, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

किल्ले राजगड येथील ११ आणि १२ डिसेंबर या दिवशीचे कार्यक्रम

  • ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता राजगड पायथा पाली गाव खंडोबाचा माळ येथे गड जागरण कार्यक्रम होणार आहे, तसेच राजगडावर पद्मावती माता मंदिर येथे शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे व्याख्यान होणार आहे.
  • १२ डिसेंबर या दिवशी सूर्योदयाच्या वेळी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ९ वाजता पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत आणि त्यानंतर पद्मावती माता मंदिर येथे पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.