कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याचा उपयोग नाही ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

गोतस्करांकडून गोरक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचे प्रकरण

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या कायद्याची कार्यवाही न करणारे उत्तरदायी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे ! – संपादक

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

उडुपी (कर्नाटक) – गोरक्षकांवर होणारी आक्रमणे निषेधार्ह आहेत. गोरक्षणाच्या कार्यावर प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांविरुद्ध शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. गोहत्याबंदी कायदा असूनही त्याचा काही उपयोगनाही. कायद्याचे कठोर पालन होणे आवश्यक आहे. शासनाने इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी तीर्थहळ्ळी येथे गोतस्करांनी गोरक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा केलेल्या प्रयत्नावर व्यक्त केली.

स्वामीजी पुढे म्हणाले की, अलीकडे गोहत्या आणि गोतस्करी बिनधास्तपणे चालू आहे, हे अत्यंत संतापजनक आहे. गोवंश टिकवण्यासाठी समाजाने कटीबद्ध झाले पाहिजे. बेवारस गायींचे रक्षण करण्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलली पाहिजेत. बेज्जवळ्ळी येथे घडलेल्या दुर्घटनेत घायाळ झालेल्यांचे चिकित्सशुल्कही सरकारने भरले पाहिजे.