परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात चौकशीच्या विरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली !

मुंबई, १६ सप्टेंबर (वार्ता.) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे देखील कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या चौकशीच्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या २ प्रकरणातील अन्वेषणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती. यामध्ये सेवेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा २ प्रकरणांचा समावेश आहे. ही याचिका अर्थात् पात्रतेच्या कसोटीवर उतरणारी नसल्याचे (नॉन मेंटेनेबल) नमूद करत न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण उघड केल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेवून अन्वेषण केले जात आहे, असा दावा परमबीर सिंह यांनी या याचिकेमध्ये केला होता. १ एप्रिल २०२० आणि २० एप्रिल २०२१ यादिवशी आपल्या चौकशीचे आदेश देण्यात आले; मात्र आपण पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप केल्यानंतरच आपली चौकशी चालू करण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले होते.