राष्ट्र उभारण्याची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित नसून ती त्याच्या संस्कृतीतूनच मिळते ! – आरिफ खान, राज्यपाल, केरळ

केरळचे राज्यपाल आरिफ खान

पुणे – राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही, तर ती त्यांच्या संस्कृतीतूनच मिळते, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले. भारतामध्ये वेगवेगळी उपासनापद्धती, भाषा, रहाणीमान आणि वर्ण असल्याने भारतीय सभ्यतेची परिभाषा एका मापदंडात करता येणार नाही. ती केवळ व्यक्तींमधील ईश्वरी अंश म्हणजेच आत्म्याच्या आधारे करता येईल. वेदांनीही त्याच आधारे भारतीय सभ्यता परिभाषित केली आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.