अमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ नष्ट करा !

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ब्राऊन शुगर विकणार्‍या डिका थोरात या महिलेला अटक करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघड झाले आहेत. हा अपप्रकार देशाला आतून खिळखिळे करू शकतो. त्यामुळे होणार्‍या परिणामांचे गांभीर्य यंत्रणेसमवेतच देशातील जनतेनेही लक्षात घ्यायला हवे. आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. आपल्या देशाच्या सीमा अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या देशाला म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान यांना लागूनच असल्यामुळे तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही तस्करी लाखो किंवा कोट्यवधी रुपयांची असते. ‘एखाद्या देशाविरुद्ध युद्ध जिंकायचे असेल, तर त्या देशातील तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनात लोटून दिल्यास सारा देश कह्यात येऊ शकतो’, असे म्हणतात. खरेतर युवा शक्तीच्या बळावरच भारत महासत्ता होऊ शकतो; परंतु जर आपली युवा शक्तीच पाश्चिमात्यांप्रमाणे व्यसनांच्या अधीन झाल्यास भारताचे भविष्य काय असणार ?

अमली पदार्थ हे ‘स्लो पॉयझन’आहे, ज्यामुळे मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा होणे, असे प्रकार उद्भवू शकतात. अमली पदार्थ मेंदूच्या अतीमहत्त्वाच्या प्रणालीवर ताबा मिळवतात. तसेच फुप्फुस, हृदय यांचे विकारही यामुळे जडतात. अमली पदार्थांचे सेवन माणसाला पशूंप्रमाणे वर्तन करण्याच्या पातळीपर्यंत घेऊन जाते. त्यामुळे भावी पिढीला भोगवादी आणि समाजविघातक होण्यापासून रोखणे अत्यावश्यक आहे. यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. आतापर्यंतच्या घटना पहाता धर्मांध, नायजेरियाचे युवक यांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचेच बर्‍याचदा आढळले आहे. अशा धर्मांधांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात. तसेच अमली पदार्थ पुरवणार्‍या नायजेरिया, पाकिस्तान आणि आखाती देशांत घुसून तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त करायला हवेत. सर्वपक्षीय सरकारांनी इच्छाशक्ती दर्शवल्यास अमली पदार्थांचे रॅकेट मुळापासून नष्ट होऊ शकते !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे