शेतकरी अपघात विमा योजनेतून अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

सातारा, ४ जून (वार्ता.) – राज्यशासनाच्या स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून जिल्ह्यातील १२७ शेतकर्‍यांना २ कोटी ५४ लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. १२६ अपघातग्रस्त शेतकर्‍यांना आणि एका शेतकर्‍याला अपंगत्व आल्याने हे साहाय्य देण्यात आले असून चौकशी अहवाल न आल्यामुळे अद्याप १६ दावे प्रलंबित आहेत. वाहन अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा झटका बसणे आदी कारणांमुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अर्थसाहाय्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी विमा योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील ९ लाख ३ सहस्र ९०० शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येकी ३२ रुपयांप्रमाणे ९१ लाख ६८ सहस्र ८५३ रुपये हप्ता भरण्यात आला आहे.