पदावरून हटवण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मौन

डावीकडून शरद पवार, अनिल देशमुख

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणामुळे पदावरून हटवण्यात येणार आहे का ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मौन बाळगले. १९ मार्च या दिवशी अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची देहली येथे भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी अन्य प्रश्‍नांवर अनिल देशमुख यांनी उत्तरे दिली; मात्र पदावरून हटवण्याच्या प्रश्‍नावर उत्तर न देताच ते निघून गेले.

मनसुख हिरेन मृत्यूच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक करत आहेत. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अहवाल आल्यानंतर आतंकवादविरोधी पथक पुढील भूमिका घेईल, असे देशमुख म्हणाले. मनसुख हिरेन मृत्यू आणि स्फोटक प्रकरण यांवरून शरद पवार हे अनिल देशमुख यांच्यावर नाराज असून गृहमंत्रीपदावर जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे.