माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

माता-पित्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या नव्या पिढीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय स्तुत्यच आहे ! संपूर्ण देशातही याची कार्यवाही करता येईल !

वाशिम (महाराष्ट्र) – उतारवयात वृद्ध माता-पित्यांना न सांभाळणा जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम त्यांना माता-पित्यांच्या अधिकोषातील खात्यांत जमा करावी लागेल, असा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेने घेतला आहे. वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मांडला. हा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत झाला आणि जिल्हा परिषदेने तसा निर्णयही घेतला.

माता-पित्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदेत केल्यास प्रारंभी संबंधित कर्मचार्‍याची पडताळणी करून त्याला तशी सक्त ताकीद दिली जाईल. तरीही त्याने न ऐकल्यास त्याच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करून ती संबंधित कर्मचार्‍याच्या आई-वडिलांच्या अधिकोषातील खात्यात जमा होईल. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली.