कृषी कायद्यांवर चर्चा करण्यावरून झालेल्या गोंधळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित !

जसे वर्गात गोंधळ घालणार्‍या मुलांना शिक्षा केली जाते, त्याच प्रकारे संसदेत गोंधळ घालणार्‍या सदस्यांवर कारवाई होणे आवश्यक ! संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे होणार्‍या पैशांचा अपव्य लक्षात घेता हा निधीही अशा बेशिस्त सदस्यांकडून वसुल करा !

नवी देहली – कृषी कायद्यांवरून चर्चा करण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज उद्या म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आले.

सकाळी १०.३० वाजता कामकाज चालू जाल्यावर विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. यामुळे प्रथम सकाळी ११.३० पर्यंत आणि नंतर दुपारी १२.३० पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतरही स्थितीत कोणताही पालट न झाल्याने दिवसभरासाठी राज्यसभा स्थगित करण्यात आली.

कृषी कायद्यावर सभापतींनी चर्चा करण्यास नकार देत ‘शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या’ असे म्हणत विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि सर्व विरोधकांनी सदनातून सभात्याग केला. त्यानंतर शून्यकाळ चालू झाला.

भाजपकडून राज्यसभेत आंध्रप्रदेशातील हिंदूंच्या मंदिरांचे सूत्र उपस्थित

भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी राज्यसभेत शून्यकाळात नोटीस दिली. आंध्रप्रदेशात हिंदूंच्या मंदिरावर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणात आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.