महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग ३)

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://sanatanprabhat.org/marathi/429155.html

लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. – https://sanatanprabhat.org/marathi/429723.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधना

१ आ ४. आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर गतजन्मांतील देवाण-घेवाण हिशोबाचा विचार न करता प्रयत्नपूर्वक वर्तमानकाळात रहायला हवे !

सौ. रुची गोल्लामुडी : गेली १० ते १५ वर्षे मला ‘स्लिप पॅरालिसिस’चा (झोपेत अंग जखडल्यासारखे होऊन हालचाल करता न येणे) त्रास होत आहे. पूर्वी मला १५ दिवसांतून एकदा असा त्रास होत असे; परंतु गेल्या वर्षभरात त्रासाचे प्रमाण उणावले असून आता मला हा त्रास ३ ते ६ मासांतून एकदा होतो. त्रासाचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले असल्यामुळे मी आनंदी आहे. पूर्वी मी असा त्रास होत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांचा धावा करत असे. आता मला हा त्रास होतो, तेव्हा मी तुमचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण करून नामजप करते. गेली कित्येक वर्षे मला हा त्रास होत आहे; पण अजूनही तो थांबत का नाही ? मला जखडून ठेवणारी ही सूक्ष्म शक्ती इतकी सामर्थ्यवान का आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘ही शक्ती सामर्थ्यवान का आहे ?’, असा विचार करण्यापेक्षा या घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. साधना करतांना अशा घटनांना फारसे महत्त्व द्यायचे नाही. मी तुम्हाला एक कथा सांगतो. दक्षिण भारतातील एक साधक मला भेटायला आला होता. तेव्हा त्याचा एक पाय कापण्यात आला. मी त्याला ‘‘काय झाले ?’’, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मी दुचाकीवरून चाललो होतो. माझ्यासमोर एक ट्रक होता आणि अकस्मात् तो थांबला. त्यामुळे मी त्याच्यावर जाऊन आदळलो आणि खाली पडलो. त्या वेळी एका पायाच्या हाडांचे तुकडे झाले. त्यामुळे तो पाय कापावा लागला.’’ त्या वेळी ‘ट्रकचालक अकस्मात्पणे का थांबला ?’, याविषयी या साधकाने अपघाताच्या वेळी तेथे जमलेल्या लोकांचे बोलणे ऐकले होते. तो ट्रकचालक लोकांना सांगत होता की, त्या वेळी एक गाय रस्ता ओलांडत होती आणि तिला वाचवण्यासाठी त्याला अचानक ट्रक थांबवावा लागला.

हा साधक बरा झाल्यावर एका ज्योतिषाला भेटायला गेला आणि त्याने विचारले, ‘‘माझ्या हातून अशी कोणती चूक झाली की, ज्यामुळे मला माझा पाय गमवावा लागला ?’’ त्यावर ज्योतिषी म्हणाला, ‘‘तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही एका गायीच्या पायाला दगड मारल्याने ती घायाळ झाली होती. त्यामुळे देवाण-घेवाण हिशोब निर्माण झाला. मागील जन्मातील हिशोब या जन्मात चुकवावा लागला. त्यामुळे गायीमुळे तुम्हाला एक पाय गमवावा लागला.’’ मी त्या साधकाला सांगितले, ‘‘ज्योतिषाला विचार ‘मागील जन्मात मला गायीला दगड मारावासा वाटण्याचे कारण काय ?’’ ही न संपणारी कथा आहे. त्यामुळे ‘वर्तमानकाळात रहाणे’ हा सर्वोत्तम मार्ग आहे. ‘का ? आणि ‘कसे ?’ हे प्रश्‍न न संपणारे आहेत. हे केवळ तात्त्विक ज्ञान आहे. त्याचा आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीही लाभ होत नाही.

(क्रमशः) 

भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430351.html

आध्यात्मिक पातळी न्यून झाल्याचे किंवा वाढल्याचे घोषित केल्यावर साधकांवर होणारे परिणाम

१. आध्यात्मिक पातळी न्यून होणे

१ अ. भावनाशीलता आणि अहंभाव हे दोष असलेले साधक : ‘साधकत्व नसलेल्या साधकाला निराशा येते.

१ आ. भावनाशीलता आणि अहंभाव हे दोष नसलेले साधक : आध्यात्मिक पातळी न्यून झाल्याचे कळल्यावर साधकत्व असलेला साधक अंतर्मुख होऊन पातळी न्यून होण्यामागचे कारण शोधतो आणि चांगली साधना होण्यासाठी प्रयत्न करतो.

२. आध्यात्मिक पातळी वाढणे

साधकाची आध्यात्मिक पातळी वाढल्याचे घोषित केल्यावर साधकाला आनंद होतो आणि तो अधिक उत्साहाने साधना करण्यासाठी प्रयत्न करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक