वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !

‘सी.एस्.टी.इ.पी’ या संशोधन संस्थेची गंभीर चेतावणी !

नागपूर – ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सी.एस्.टी.इ.पी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि ‘आयपीसीसी’च्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ ते २०५० या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे, तसेच पावसाचे दिवस आणि अतीवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होणार असून हा अभ्यास भविष्यातील धोक्याची घंटा मानली जात आहे.

हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी यांनी म्हटले आहे की, भारत देश आधीच नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात जगामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. प्रदूषण असेच अनियंत्रित राहिले, तर वर्ष २०५० पर्यंत राज्याच्या विविध भागांत भीषण तापमान वाढ होणार आहे. अमरावती आणि संभाजीनगर येथे सर्वाधिक २.९ अंश सेल्सिअसने तापमान वाढेल.

यवतमाळ जिल्हा वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस ३ ते ९ दिवसांनी वाढतील. सरासरी पावसाच्या वाढीमुळे धुळे, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि पुणे यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो; मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग, बुलढाणा, हिंगोली, कोल्हापूर आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतीवृष्टीच्या (१०० मिमी हून अधिक पाऊस) घटना घडतील.