समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!

‘बर्‍याच दिवसांपासून मी ‘मला पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या प्रसार दौर्‍यात सहभागी होता यावे’, अशी गुरुचरणी प्रार्थना करत होते. या वर्षी गुरुकृपेने मला ही अमूल्य संधी लाभली. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे मी श्री गुरुचरणी समर्पित करत आहे.

पू. रमानंद गौडा

१. समष्टीसाठी सतत झटणे

प्रसारदौर्‍याच्या वेळी प्रतिदिन अनुमाने २ ठिकाणी पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन केले होते. प्रत्येक मार्गदर्शनात ते न्यूनतम दीड ते २ घंटे बोलत असत. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी अन् संपल्यानंतर अनेक साधक आणि धर्मप्रेमी पू. अण्णांशी संवाद साधण्यासाठी येत असत. पू. अण्णा निरपेक्ष प्रेमाने प्रत्येकाशी संवाद साधत असत. त्या वेळी ‘देहाची पर्वा न करता समष्टीसाठी सतत त्याग करणे’, हा संतांचा गुण मला शिकायला मिळाला.

२. काही वेळा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातांना चालक उपलब्ध नसत. अशा वेळी पू. अण्णा स्वतः वाहन चालवत असत.

३. प्रवास करत असतांना थोडा वेळ मिळाला, तरी पू. अण्णा नामजप किंवा प्रार्थना करून सतत अनुसंधानात रहात असत.

४. समाजातील लोक आणि साधक यांना त्यांच्या स्तरानुसार मार्गदर्शन करणे

पू. अण्णा समाजातील विविध स्तरांतील लोकांना, तसेच विविध साधकांना (क्रियाशील साधक, साधना-सत्संगातील साधक, धर्मशिक्षण वर्गातील साधक, प्रासंगिक सेवा करणारे साधक इत्यादींना) मार्गदर्शन करतात. त्या वेळी ते प्रत्येकाला त्याच्या स्तरानुसारच मार्गदर्शन करतात. त्यासाठी ते सतत अभ्यास करत असतात.

सौ. लक्ष्मी पै

५. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची तळमळ

अनेक साधक शिकण्यासाठी पू. अण्णांच्या समवेत येतात. रात्री सर्व साधकांसाठी विशेष सत्संग असतो. त्यामध्ये ‘साधकांना त्या दिवसाच्या कार्यक्रमातून शिकायला मिळालेली सूत्रे, झालेल्या चुका आणि त्यांचे विश्लेषण, तसेच व्यष्टी साधनेचे प्रयत्न’, यांचा आढावा घेतला जातो. सर्व साधकांनी यात सहभागी होणे अपेक्षित असते. त्या वेळी पू. अण्णा ‘साधक कुठे न्यून पडले ?’, याची त्यांना जाणीव करून देतात. काही वेळा ते साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांची कठोरपणे जाणीव करून देऊन ‘त्या साधकांनी कुठे अन् कशा प्रकारे सुधारणा केल्या पाहिजेत ?’, हेही स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे साधकांमध्ये अंतर्मुखता निर्माण होऊन त्यांच्यात खर्‍या अर्थाने परिवर्तन होऊ लागते. त्यानंतर पू. अण्णा त्या साधकांशी अत्यंत वात्सल्याने वागतात. यावरून मला पुढील सुभाषिताची आठवण झाली.

वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ।
लोकोत्तराणां चेतांसि को नु हि विज्ञातुमर्हति ।। – भवभूति (उत्तररामचरित, अङ्क २, श्लोक ७)

अर्थ : असामान्य (थोर) व्यक्तींचे मन वज्राहूनही कठोर असते आणि फुलाहूनही कोमल असते. अशा लोकोत्तर पुरुषांच्या मनाचा ठाव घेण्यास कोण समर्थ आहे ? केवळ संतच साधकांमध्ये खरे परिवर्तन घडवू शकतात.

६. कृतज्ञता

संतांच्या या ‘भक्तीप्रवासा’त सहभागी होण्याची संधी केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते. ज्या साधकांनी याचा लाभ घेतला आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे, उदा. व्यष्टी साधनेतील प्रयत्न, अंतर्मुखता आणि समष्टी भाव यांमध्ये वाढ होणे. ‘हे सर्व केवळ गुरुकृपेमुळेच शक्य होत आहे’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

‘गुरुदेव, आपणच या अज्ञानी जिवाकडून हा लेख लिहून घेतला. मी हा लेख आपल्या चरणी पुष्परूपाने समर्पित करते.’

– सौ. लक्ष्मी पै (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५८ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (२.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक