छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या ग्रामविकास अधिकार्‍यांना अटक !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मक्रणपूर आणि रेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास जोंधळे (वय ५० वर्षे) यांना ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जूनला ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी ‘नवबौद्ध घटक परिसर विकास योजने’अंतर्गत आंबेडकरनगर आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर अन् अण्णाभाऊ साठेनगर येथे एकूण १० लाख रुपयांचे पी.व्ही.आर्. ब्लॉक बसवण्याचे काम केले होते. हे काम पूर्ण होऊन २ महिने झाले, तरी जोंधळे त्याचे अंतिम देयक काढण्यास टाळाटाळ करत होते. हे देयक संमत करण्यासाठी जोंधळे यांनी ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

संपादकीय भूमिका

सरकारी वेतन असतांनाही लाच घेणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !