मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !

‘मी दिवसभरातील वैयक्तिक कृती आणि स्वयंपाकघरात सेवा करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्याकडून त्यांना आत्मनिवेदन केले जाते, तसेच विविध प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त होतात. मी केलेले आत्मनिवेदन आणि मी करत असलेल्या काही प्रार्थना अन् कृतज्ञता येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करणे

‘मला सकाळी झोपेतून उठतांना पुष्कळ शारीरिक त्रास जाणवत असतो. तेव्हा मला वाटते, ‘मला शारीरिक थकवा असल्याने आज माझ्याकडून सेवा होणार नाही.’ तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून सांगते, ‘मला तुमच्या अनुसंधानात रहाता येऊ दे. मला परिस्थिती स्वीकारून आणि सर्वांचे ऐकून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करता येऊ दे. माझे पाय दुखायला लागले, तर मी सेवा कशी करू ? मी स्वयंपाकघरात सेवा करण्यास निघाले आहे. पुढचे तुम्ही बघा. मला ठाऊक नाही.’

२. प्रार्थना

२ अ. स्नान करत असतांना जलदेवतेला केलेली प्रार्थना

हे जलदेवते, तुझ्या कृपेमुळे मी जिवंत आहे. सर्व नद्यांचे तीर्थ या जलात येऊ दे. सप्तर्षी, महर्षि, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातनचे सद्गुरु अन् सर्व संत यांच्या चरणांचे तीर्थ या जलात येऊ दे. या जलाने स्नान केल्यावर माझे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होऊन मला उत्साहाने सेवा करता येऊ दे. शेवटी मी ‘हर हर गंगे’, असे म्हणते.

२ आ. सूर्यनारायणाला प्रार्थना करणे 

हे सूर्यनारायणा, या आपत्काळात सनातनच्या प्रत्येक साधकाचे रक्षण होऊ दे. तुझ्या प्रत्येक किरणातील चैतन्यामुळे सर्व साधकांवर उपाय होऊ दे. तुझ्या तेजाचे वलय सर्व साधकांच्या भोवती निर्माण होऊन त्यांच्यावर असलेले अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट होऊ दे. तुझी कृपादृष्टी प्रत्येक साधकावर असू दे.

३.  अन्नपूर्णादेवीप्रती ठेवलेला भाव आणि तिला केलेल्या प्रार्थना 

३ अ. स्वयंपाकघरातील अन्नपूर्णादेवीची पूजा करत असतांना ठेवलेला भाव 

मी स्वयंपाकघरातील अन्नपूर्णादेवीची पूजा करत असतांना ‘देवीच समोर आहे’, असा माझा भाव असतो. त्या वेळी ‘देवीला हळुवारपणे स्नान घालूया. ‘देवीच्या नाकावर कुंकू पडणार नाही’, याची काळजी घेऊन तिच्या कपाळावर गोलाकार कुंकू लावूया’, असा माझा भाव असतो.

३ आ. अन्नपूर्णादेवीला केलेली प्रार्थना 

‘हे अन्नपूर्णादेवी, तुझी पूजा करतांना माझे काही चुकले असल्यास मला क्षमा कर. जगातील सनातनच्या सर्व साधकांवर तुझी कृपादृष्टी असू दे. सनातनच्या प्रत्येक साधकाच्या भोवती तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

३ इ. भाकरी आणि पोळ्या करत असतांना केलेली प्रार्थना 

हे अन्नपूर्णामाते, तुझे चैतन्य अन्नपदार्थांत येऊ दे. तुझा प्रसाद ग्रहण केल्यावर साधकांचा त्रास न्यून होऊ दे.

३ ई. अन्नपूर्णादेवीला नैवेद्य दाखवतांना करत असलेली भावपूर्ण प्रार्थना 

हे अन्नपूर्णामाते, ‘तूच माझ्याकडून करून घेतलेला स्वयंपाक (अन्न) तुझ्या चरणी अर्पण करत आहे. या अन्नातून सर्व साधकांना ऊर्जा, शक्ती आणि चैतन्य मिळू दे. ज्या ठिकाणी सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे आहेत, त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या भोवती तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे. जे साधक बाहेर प्रसाराला जातात, त्यांना ऐनवेळी बाहेरचे खाद्यपदार्थ खावे लागतात. त्या वेळी तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच त्यांच्या भोवती निर्माण होऊ दे. साधकांना कुठल्याही प्रकारे त्रास व्हायला नको. साधकांनी महाप्रसाद ग्रहण केल्यावर तुझ्या तेजाने त्यांच्याही अंतर्मनात साधनेचे तेज येऊ दे.’ मी अशी प्रार्थना करत असतांना मला सूक्ष्मातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होते.

३ उ. रुग्णाईत साधकाला महाप्रसाद देतांना केलेली प्रार्थना 

हे अन्नपूर्णामाते, रुग्णाईत साधकांनी ग्रहण केलेल्या महाप्रसादातून त्यांच्या भोवती तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे. रुग्णाईत साधकांना बरे वाटू दे.

३ ऊ. दही बनवण्यासाठी दुधाला विरजण लावतांना केलेली प्रार्थना 

हे श्रीकृष्णा, तुझ्या गोकुळात दुधाला विरजण लावत आहे. साधक म्हणजे गोपगोपीच आहेत. ते हे दही ग्रहण करणार आहेत. तेव्हा तुझ्या चैतन्याने भरलेले दही साधकांना ग्रहण करण्यास मिळू दे.’

मी प्रत्येक सेवा करत असतांना सेवेच्या स्वरूपानुसार देव मला प्रार्थना सुचवतो. सेवा झाल्यावर माझ्याकडून परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

४. कृतज्ञता

४ अ. भूमातेप्रती व्यक्त होत असलेली कृतज्ञता 

मी भूमातेवर पाय ठेवण्यापूर्वी तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. नंतर मी भूमातेला सांगते, ‘प्रत्येक जिवाचा भार सहन करणार्‍या, क्षणोक्षणी सर्वांचे रक्षण करणार्‍या, जिवांत भेदभाव न करणार्‍या, आश्रम, सेवाकेंद्रे, मंदिरे आणि घरे इत्यादींचे भार पेलणार्‍या भूमाते, मी तुला कोटीशः साष्टांग नमस्कार करते.

४ आ. सद्गुरु, संत आणि साधक यांच्याप्रती कृतज्ञता ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तुमच्या चरणी ब्रह्मांडाएवढी कृतज्ञता ! आम्हाला ३ हिरे, म्हणजे तुम्ही, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ; रत्ने अन् माणिके, म्हणजे सद्गुरु, संत आणि आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असलेले साधक, म्हणजे मोती दिल्याबद्दल कृतज्ञता !

४ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासारखे सद्गुरु दिल्याबद्दल कृतज्ञता ! 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सांगत असलेल्या नामजपादी उपायांमुळे साधकांचा त्रास न्यून होतो. साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी सद्गुरु गाडगीळकाका करत असलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे आम्हा साधकांना कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि शांत रहाता येते. साधक जगात कोणत्याही कठीण प्रसंगात कुठेही असू दे, १ सेकंदही वाया न घालवता सद्गुरु गाडगीळकाका साधकांना नामजपादी उपाय सांगतात आणि त्या साधकाला अभय देतात.

४ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्वाची प्रचीती आणि त्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता !

४ ई १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा गुरुकार्याप्रतीचा ध्यास : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ २४ घंटे सेवारत असतात. त्या सेवा सांभाळून सर्व कौटुंबिक कर्तव्येही पार पाडतात आणि कुटुंबियांचीही काळजी घेतात.

४ ई २. साधकांना घडवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘प्रत्येक साधक कसा घडेल ?’, याची काळजी घेतात. त्या साधकाला साधनेसंदर्भात योग्य मार्गदर्शन करतात. साधकांकडून चुका झाल्यास श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संबंधित साधकाला त्याच्या चुकीची जाणीव करून देतात आणि त्याला प्रेमाने समजावून सांगतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकाच्या मनातील प्रत्येक विचार जाणून त्याला साधनेत पुढे जाण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करतात. अशा देवी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिल्याबद्दल कृतज्ञता !

४ उ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची प्रचीती आणि त्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता !

सौ. शोभा पांडुरंग कौलकर

४ उ १. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची प्रीती : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ प्रत्येक जीव आणि साधक यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ साधकांच्या मनातील जाणून त्यांना उपाययोजना सांगतात. त्या साधकांना सतत ‘आनंदी कसे रहायचे ?’, याविषयी सांगतात.

४ उ २. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा गुरुकार्याप्रतीचा ध्यास : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सतत गुरुकार्यासाठी झटत असतात. महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार त्या ‘परात्पर गुरुदेव आणि साधक’ यांचे रक्षण होण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात देवतांचे दर्शन घेण्यासाठी जातात. महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार त्या सर्व साधकांसाठी मनोभावे प्रार्थना आणि यज्ञ करतात. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ चारही ऋतूंमध्ये दैवी दौरे करत असतात.

४ उ ३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या नुसत्या आठवणीने नामजप चालू होणे : अशा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या एका हास्याने आणि त्यांच्या दर्शनाने आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. त्यांची नुसती आठवण जरी आली, तरी माझा त्वरित नामजप चालू होतो. त्यांचा छायाचित्रातील हसरा चेहरा माझ्यासमोर येऊन माझ्या मनाची मरगळ दूर होते. अशा देवीतत्व असलेल्या ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्हाला दिल्याबद्दल कृतज्ञता !

‘गुरुदेवा, सदैव तुम्हीच जिंकता. ‘आम्हाला तुमच्या चरणांची धूळ म्हणून सदैव रहाता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. ‘तुम्हीच मला हे सुचवले आणि  माझ्याकडून लिहून घेतले अन् मला आनंद दिला’, त्याबद्दल मी तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (२०.२.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक