धर्माधिष्ठित बंगालवरील सांस्कृतिक आक्रमणे आणि पुनरुत्थान !

 रामनाथी, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. आज बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.

पू. (डॉ.) शिवनारायण सेन

पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचा परिचय

पू. (डॉ.) शिवनारायण सेन हे बंगालचे शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव आहेत. महान संत श्रीमान उपेंद्र मोहन यांनी ‘शास्त्र-धर्म प्रचार सभा’ या संघटनेची स्थापना केली आहे. ‘शास्त्र-धर्म प्रचार सभा’ धर्मशिक्षण आणि धर्मजागृती या उद्देशाने अखंड कार्यरत आहे. या सभेकडून प्रकाशित होणारे इंग्रजी नियतकालिक ‘ट्रूथ’ मागील ८० वर्षांपासून हिंदु धर्मशास्त्राचा प्रचार करत आहे. या नियतकालिकाचे ते संपादक आहेत.

हिंदु धर्माच्या नावावर अनेक संप्रदाय आहेत; परंतु ते शास्त्राच्या मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे समाजाला योग्य दिशादर्शन करण्यासाठी श्रीमान उपेंद्र मोहन यांनी ‘शास्त्र-धर्म प्रचार सभे’ची स्थापना केली. धर्म केवळ एकच आहे आणि तो म्हणजे ‘सनातन’ धर्म अन् इतर सर्व संप्रदाय आहेत. ‘सनातनं मतं सत्यं चीयते नापचीयते ।’ (अर्थ : सनातन सत्य असते; जे वाढत जाते, अल्प होत नाही.) जो कधी परिवर्तित होत नाही, जो सृष्टीच्या प्रारंभापासून अंतापर्यंत चालत रहातो, तो ‘सनातन धर्म’ आहे. बंगालमधील हिंदूंनी आतापर्यंत सोसलेली आक्रमणे आणि तेथील धर्मनिष्ठ हिंदूंचा तेजस्वी इतिहास या भागात पाहूया.

१. काश्मीरच्या १०० सैनिकांना ठार मारून ५०० जणांना जायबंदी करणारे धर्मबळसंपन्न बंगालमधील ५ नि:शस्त्र पुरुष !

बंगाल एकेकाळी शक्तीपीठ होते. येथे अनेक साधक, अनेक विद्वान होते. धर्माच्या आधारावर चालणारा हा समाज किती शक्तीशाली होता, या संदर्भातील एक उदाहरण आपल्या निदर्शनास आणून देतो.

१ अ. काश्मीरच्या राजाने बंगालच्या राजाला बोलावून कपटाने ठार करणे : त्या काळी ललितादित्य मुक्तापीड काश्मीरचा राजा होता. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने कपट करून बंगालच्या हिंदु राजाला निमंत्रण दिले की, ‘तुमच्याशी सल्लामसलत करायची आहे. एक दुसर्‍याची चौकशी करायची आहे. मैत्री अन् संधी करायची आहे, तरी यासाठी तुम्ही यावे.’ जेव्हा बंगालचा राजा तेथे पोचला, तेव्हा ललितादित्य मुक्तापिडाने त्याला घेरून ठार केले. बंगालचा राजा एकटाच होता. त्याच्या समवेत आलेले सैनिक बाहेर होते. ते काहीच करू शकले नाहीत.

१ आ. बंगालच्या ५ धर्मनिष्ठ पुरुषांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून शत्रूवर प्रतिआक्रमण करणे : जेव्हा ही वार्ता बंगालमध्ये पोचली, तेव्हा हिंदूंचे रक्त उसळून आले. ज्यांची धर्मावर निष्ठा होती, त्यातील केवळ ५ पुरुष निःशस्त्र काश्मीरला गेले. तेथे ते संधीचा प्रस्ताव घेऊन ललितादित्य मुक्तापिडाजवळ पोचले. तो बौद्ध राजा होता. त्याने विचारले, ‘‘काय विषय आहे ?’’ अशा २-४ गोष्टी झाल्या आणि अचानक हे पाचही जण त्याच्यावर झेपावले. त्याच्या सुरक्षारक्षकांशी झटापट चालू झाली. त्या राजाच्या सिंहासनाच्या मागे एक खड्डा होता, त्यातून त्याला पळून जाण्यासाठी भुयार बनवलेले होते. तेव्हा त्या राजाने तेथून उसळून उडी मारली. त्यामुळे त्याचे हात-पाय मोडले. मार बराच खोलवर लागल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. जेव्हा त्याला शुद्ध आली, तेव्हा त्याने विचारले , ‘‘काय बातमी आहे ?’’ बाजूचे लोक म्हणाले की, ‘आता सर्वकाही ठीक आहे.’ तेव्हा राजाने विचारले, ‘‘काय घडले ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘ते जे ५ पुरुष आले होते, त्यातील ४ जणांना आम्ही ठार मारले आणि त्यातील एकाने आत्महत्या केली.’’ राजाने विचारले, ‘‘त्यांनी आपली काय हानी केली ?’’ लोकांनी सांगितले, ‘‘त्यांनी आपल्या १०० सैनिकांना ठार केले आणि ५०० सैनिकांना एवढ्या गंभीररित्या घायाळ केले की, ते जिवंत रहातील कि नाही, याची शाश्वती देता येत नाही.’’

५ निःशस्त्र पुरुष आले, त्यांनी १०० लोकांना मारले आणि ५०० जणांना घायाळ केले. त्यांनीच लढाई करून त्यांचे प्राणही दिले. या भारतदेशातील असा हा बंगाल आहे. जेव्हा भारतात आणि बंगालमध्ये धर्माधिष्ठित राज्य होते, त्या वेळची ही गोष्ट आहे.

२. न्यायशास्त्राविषयीचा ग्रंथ एकदाच चाळून तो मुखोद्गत करणारे विद्वान रघुनाथ शिरोमणी !

त्या काळी एवढी विद्वत्ता होती की, रघुनाथ शिरोमणी मिथिलेला न्यायशास्त्र शिकण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना सांगण्यात आले की, ‘आम्ही तुम्हाला न्यायशास्त्राचा ग्रंथ येथून नेऊ देणार नाही.’ रघुनाथ शिरोमणी केवळ ७ दिवसांसाठी तेथे गेले होते. ते म्हणाले, ‘‘मला दाखवा तरी तो ग्रंथ.’’ त्यांनी ग्रंथ पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत चाळला. त्यांना सांगितले की, ‘‘तुम्ही ग्रंथ देणार नाही, तर ठीक आहे.’’ ते तेथून निघून आले. त्यांना तो ग्रंथ पहिल्यापासून शेवटपर्यंत मुखोद्गत झाला होता. तो त्यांनी लिहून काढला आणि त्याचा अभ्यास केला. त्या काळी आपली अशी विद्वत्ता होती.

३. वर्णाश्रमव्यवस्था नष्ट झाल्यामुळे बंगालमधील बहुतांश हिंदू मुसलमान होणे

नंतरच्या काळात जेव्हा मुसलमानांनी बंगालवर आक्रमण केले, तेव्हा तेथील लोकांमध्ये लढण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे ते फारच लवकर मुसलमान बनले. बौद्ध लोक म्हणत होते की, ‘धर्मायला जोगोन रूपी माथा दिया काला टोपी. (अर्थ : मुसलमान जोग्याच्या रूपात डोक्यावर काळी टोपी परिधान करून आले.)’ तेव्हा बंगालमधील बहुतांश लोक हिंदु धर्म त्यागून मुसलमान बनले. बंगालमधील वर्णाश्रमव्यवस्था संपूर्णपणे नष्ट झाली. हिंदु धर्म राहिला नाही, त्यामुळे तेथील अधिकांश लोक मुसलमान बनले. उत्तरप्रदेश, देहलीमध्ये जेथे बादशहाचे राज्य होते, मुसलमानांचा बालेकिल्ला होता, तेथे १० टक्के लोक मुसलमान झाले आणि आमच्या पूर्व बंगालमध्ये, पश्चिम सिंधमध्ये बहुतांश लोक मुसलमान झाले; कारण वर्णाश्रमव्यवस्था नव्हती.

४. स्त्रियांवर प्रचंड अत्याचार करणार्‍या सिराजउद्दौलाची क्रूर राजवट !

त्यानंतर सिराजउद्दौला आला. दूरचित्रवाहिनीवर सिराजउद्दौलाची मालिका चालू होती. त्यात ‘तो किती सुंदर राजा होता, त्याला पाहून स्त्रिया त्याच्यावर किती भाळत होत्या’, आदी कथा आताही दाखवल्या जात होत्या. वस्तूस्थिती अशी आहे की, जेव्हा सिराजउद्दौला मेला, तेव्हा हिंदु स्त्रियांनी उत्सव साजरा केला आणि त्याच्या छायाचित्रावर आघात करून मनातील राग शांत केला. कोलकाता येथे शोभा बाजारच्या राजबाडीमध्ये भव्य मिरवणूक निघाली आणि मोठी दुर्गापूजा करण्यात आली; कारण तो स्त्रियांवर प्रचंड अत्याचार करत होता.

५. भारतात साम्यवाद पसरवण्यामागे इंग्रजांचे कारस्थान

सिराजउद्दौलाहून इंग्रज अधिक बदमाश होते. त्यांनी हळूहळू २ कामे केली. स्वातंत्र्यसंग्रामात बहुतांश हिंदू होते. स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणारे जेवढे कारागृहात गेले होते, त्यांना या इंग्रजांनी कम्युनिस्ट साहित्य वाटणे चालू केले. साम्यवाद (कम्युनिझम्) शिकण्यासाठी त्यांनी रजनी पाम दत्ता, ज्योती बसू आणि मानवेंद्र राथाय अशा प्रमुख लोकांना इंग्लंडला पाठवले. ते तेथून खरा साम्यवाद असलेले रशियन साहित्य शिकून यावेत, यासाठी इंग्रजांनी ही युक्ती केली. त्यानंतर त्यांनी या देशात साम्यवाद रुजवला आणि या साम्यवादाचे विष संपूर्ण भारतभर पसरले.

६. लक्षावधी हिंदूंची कत्तल होऊ देणारी मात्र हिंदूंना प्रतिशोध घेण्यापासून थांबवणारी मुस्लिम लीग !

त्यानंतर ‘मुस्लिम लीग’चे सरकार आले. मुस्लिम लीगने काय केले ? त्यांनी सुराल यांना मुख्यमंत्री बनवले. त्यानेही कोलकात्यामध्ये हिंसाचार केला. कोलकाता शहरात चारही बाजूंनी हिंदूंना प्रचंड मारहाण झाली. आमचे सर्व पूर्वज अतिशय प्रेमळ लोक होते. त्यांनी मुसलमानांना आश्रय दिला होता. त्यांच्याही घराघरांत घुसून मुसलमानांनी मारले. तेव्हा सुराल काय करत होते ? लाल बाजारमध्ये पोलिसांचे मुख्यालय आहे, तेथे ३ दिवस दारे बंद करून राहिले आणि लक्षावधी हिंदूंची कत्तल झाल्यानंतर बाहेर आले.

तेवढ्यात हिंदू सिद्ध झाले होते. जेवढे जिवंत होते, त्यांनी लोखंडाची शस्त्रे बनवली. भाले बनवले. आता त्या मुसलमानांना मार पडू लागला. त्या वेळी सुराल यांनी ‘शांती, शांती, नियंत्रण करा, नियंत्रण ठेवा,’ म्हणत सर्व नियंत्रणात आले. आधी ३ दिवस अनियंत्रित होऊ दिले. त्या वेळी ‘मिस डील ऑफ मायावी गांधी’, असे आमच्या ‘ट्रूथ’च्या संचालकांनी लिहिले. त्या वेळी ‘ट्रूथ’मध्ये लिहिले होते ‘ॲनॅगर्किक लायर ऑफ द सुरावर्दी’. सुरावर्दीनंतर आणखी १ लाख हत्या झाल्या; कारण तोही अत्याचारी होता. तेव्हा ‘ट्रूथ’कडून २ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला, खटला चालला. त्या वेळी श्री. उपेंद्र मोहनजी हे संत समाजात प्रसिद्ध होते. त्यांनी असे लिहिले की, न्यायालयात ७ दिवस त्यांच्या प्रतिवादावर सर्व इंग्रज न्यायाधीश गुपचूप बसले. ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांचे दंडाचे २ सहस्र रुपये परत करण्यात आले.

त्यानंतर विरहिल्ट यांनी त्यांना बोलावून सांगितले, ‘‘तुम्ही थोडेसे गोड शब्दांत लिखाण करा. तुम्ही फार कडक शब्दात लिखाण करता.’’ आमचे उपेंद्र मोहनजी यांच्या मते, ‘जेथे पाप आहे, जेथे अधर्म आहे, जेथे असत्य आहे, तेथे धैर्याने विरोध करा.’ याच पद्धतीने आमचे कार्य चालू आहे.

७. हिंदु धर्म, संस्कृती, शास्त्रे यांविषयी लोकांच्या मनातील श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे इंग्रज !

वर्ष १८५५ मध्ये इंग्रजांनी पाहिले की, भारतावर राज्य करायचे असेल, तर संस्कृत भाषेत शिरकाव करावा लागेल. त्याप्रमाणे त्यांनी आमचे वेद, उपनिषदे यांची चुकीची व्याख्या करण्यासाठी मॅक्सम्युलरला बोलावले. मॅक्सम्युलर त्या वेळी केवळ ३५ वर्षे वयाचा होता. त्याला विचारले की, ‘तुला जगायचे आहे कि मरायचे आहे ?’ तो घाबरला. तो जर्मन संशोधनतज्ञ होता. त्याने घाबरून आणि लोभापायी सर्व हिंदु शास्त्रे, वेद, उपनिषदे यांची चुकीची व्याख्या केली. तिच व्याख्या आजही चालू आहे. संपूर्ण भारतात केवळ बंगालमध्येच नाही, तर हे विष नखातून आरंभ करून शिखेपर्यंत पोचले आहे. अशा प्रकारे त्यांनी भारतातील संस्कृती, शास्त्र शिक्षण आदींना तोडूनमोडून युरोपीय पद्धतीने लोकांसमोर उभे केले. जेणेकरून सर्वांना ख्रिस्ती, मुसलमान बनवणे शक्य होईल.

८. सतीप्रथा, म्हणजे शक्ती, तेज, विक्रम आणि पराक्रम यांचे प्रतीक !

इंग्रजांनी आपली धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था, सर्व समाजाविषयी असलेली सहृदयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सतीची प्रथा नष्ट करण्यासाठी आपल्यातीलच राजा राममोहन राय यांना उभे केले. भारतदेशात काय अद्वितीयता आहे ! एक लहानशी मुलगी विधवा झाली. तिला सांगितले की, ‘तू जागृत हो. तू आणखी एकदा विवाह कर.’ तेव्हा ती रडू लागली. ती म्हणाली, ‘माझ्यासाठी जळती मशाल घेऊन या.’ ती आणली. तिने मशालीवर तिचे बोट ठेवून जाळून टाकले, ते बोट जळून काळे भस्मसात झाले; परंतु तिचा मोह थोडाही ढळला नाही. लॉर्ड बेटिंगला वाटत होते की, सतीची प्रथा नष्ट केली जावी. तो विचारच करू शकत नव्हता की, हिंदु रमणीमध्ये, मातेमध्ये किती शक्ती आहे ! किती तेज आहे ! किती विक्रम आहे ! किती पराक्रम आहे !

९. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी उच्चशिक्षित तरुणांना ख्रिस्ती होण्यापासून थांबवणे

साम्यवादी श्री दुर्गापूजेवर विश्वास करत नव्हते. त्यामुळे लोकांचा मूर्तीपूजेवरील विश्वास उडाला. उच्चशिक्षित तरुणांना अन्य पंथियांचे आकर्षण वाटू लागले. कोणी म्हटले, ‘ख्रिस्ती नाही, ‘ब्राह्मो’ बनूया.’ स्वामी विवेकानंद, शारदानंद, ब्रह्मानंद सर्वच्या सर्व मोठे तेजस्वी होते. सर्वजण ब्राह्मो बनले. त्यांना रामकृष्णांनी बोलावले, तर ते युवक त्यांच्या चरणी समर्पित झाले. त्यांनी विवेकानंदांना म्हटले, ‘अरे, तू जिला मूर्ती म्हणतोस, ती तर सजीव माता आहे.’ त्याने कापूस आणला आणि मातेच्या नाकासमोर धरला, तर तो कापूस श्वासासमवेत हलत होता. त्या श्वासासह तिचे मस्तकही हलत होते. ते पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी डोळे चोळून स्वच्छ केले. विवेकानंदांना प्रत्यय झाला. एकानंतर दुसर्‍या घटनांनी त्यांना दाखवले की, ‘मूर्तीपूजेतील ही केवळ निर्जिव मूर्ती नाही. तुला जी मातीची दिसते, ती खरेतर चिन्मयी आहे. तीच खरी चेतना आहे.’ अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ती होण्यापासून बंगालच्या युवकांना थांबवले.

१०. मुसलमानांनी १० सहस्र हिंदूंचा संहार करूनही कागदोपत्री केवळ १० हिंदू ठार झाल्याचे दाखवणारे साम्यवाद्यांचे सरकार !

त्यानंतर वर्ष १९७७ मध्ये कम्युनिस्ट लोक आले. त्यांनी पहिलेच मोठे कार्य केले, ते म्हणजे वर्ष १९७७ मध्ये त्यांनी संस्कृत शिकवायचे बंद केले. बांगलादेशमधून आलेल्या लोकांना मध्यप्रदेशमध्ये पुनर्वसन करून ठेवले जात होते. तेव्हा यांनी म्हटले, ‘‘आमच्या सुंदरबनमध्ये रहायला या.’’ दीड लाख बंगाली लोकांना पूर्व बंगालहून आणून येथे वसवले. साम्यवाद्यांना ही मते मिळणार नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गोळ्या चालवल्या. सरकारी अहवालानुसार १० लोक ठार झाल्याचे सांगण्यात आले. माहिती काढल्यानंतर आता १० सहस्र लोकांना ठार करण्यात आल्याचे समजले. त्यांनी एक संपूर्ण बेट संपवले. अनिता दिवाण नावाची एक मुलगी होती. ती आरोग्य विभागामध्ये कर्मचारी होती. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासंदर्भात मुसलमानांमध्ये कार्य करत होती. तिला ठार मारण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्या कारवाया चालू राहिल्या. संपूर्ण विद्यापिठात त्यांचे सर्व काळे धंदे चालत होते. त्या वेळच्या आमच्या पंतप्रधान काहीच बोलल्या नाहीत, गुपचूप बघत राहिल्या.

११. भगवंताच्या कृपेने आम्ही अधर्माच्या विरोधात लढू शकलो !

आमच्यावर कितीतरी कठोर आघात झाले; परंतु संत प्रेमानंद सरस्वती, ठाकूर सीताराम, बंगालधील सर्व संत, धर्मसम्राट करपात्री महाराज, आता निरंजन देवकी, सिंधू महाराज, कांची कामकोटी पिठाचे पीठाधिश्वर स्वामी जयेंद्र सरस्वती आदी अनेक संत आमच्या समवेत कार्य करत आहेत. पापाविरुद्ध, व्यभिचाराच्या विरुद्ध लढायचे आहे, हे लक्षात ठेवून धर्मासाठी कार्य करावे लागते. आम्हाला जाणीव आहे, आमचे परममित्र आमचे श्री भगवान आहेत. त्यांच्या कृपेनेच सर्व संभव होत आहे. त्याच्या बळावरच भारतात हिंदु राष्ट्र येईल. हे हिंदु  राष्ट्र बनवण्यासाठी त्याची शक्ती कार्य करील. यासाठी संतांच्या चरणी नमन आणि भगवान शिवाला प्रार्थना करत आहोत !

जयन्ति शास्त्राणि द्रवन्ति दाम्भिकाः ।
हृष्यन्ति सन्तो निपतन्ति नास्तिकाः ।।

अर्थ : जेव्हा शास्त्रांचा विजय होतो आणि ढोंगी पळ काढतात, तेव्हा सज्जनांना आनंद होतो अन् नास्तिकांचा पराभव होतो.’

– (पू.) डॉ. शिवनारायण सेन, संपादक, मासिक ‘ट्रूथ’, शास्त्र-धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल

उत्तरप्रदेश सरकारने बंद केलेल्या ६४ पशूवधगृहांना बंगालमध्ये आमंत्रित करणार्‍या हिंदुद्वेषी ममता बॅनर्जी !

‘मोहनदास गांधींनी गुपचूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी म्हटले होते की, ‘गोहत्या बंद झाली नाही, तर मला स्वराज्य नको’; परंतु तसे काही झाले नाही. स्वराज्यात त्यांनी गोहत्या बंद केली नाहीच, उलट वाढतच गेली. सध्या हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश आदी राज्यांमध्ये गोहत्या बंद आहे. त्यामुळे सर्व गायी बंगालमध्ये नेण्यात येत आहेत. कानपूरमधील ६४ पशूवधगृहे सरकारने बंद केली; कारण त्यातील चामड्याचे पाणी अतिशय घाणेरडे होते. चामडे धुतलेले पाणी गंगा नदीत मिसळल्याने गंगेचे पाणीही लाल रंगाचे होत होते. त्यानंतर आमच्या मुख्यमंत्री ममतादीदी यांनी काय केले ? त्या म्हणाल्या, ‘‘जी ६४ पशूवधगृहे बंद केली आहेत, ती आम्हाला द्या.’’ असे विचार कोठून आले, जरा विचार करा.’’


भगवान शिवाचे ध्यान केले, तर विजय निश्चित !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे, ‘भगवंताच्या शक्तीनेच विजय होतो.’ आज ज्याने कुणी झाडू घेऊन ‘स्वच्छ भारत आणि स्वच्छ बंगाल’ करण्याचे मोठे काम केले, तसेच राजकीय क्षेत्रात जे काम झाले, तेही ईश्वराच्या कृपेनेच झाले आहे. आपल्यामुळे नाही. ज्याला विजय मिळाला, तोही म्हणतो की, भगवंताचे देणे आहे, ही भगवंताची दया आहे.

उत्पत्ती आणि लय करणारे आमचे भगवान शिव सर्वांच्या हृदयात बसलेले आहेत. त्यामुळे जर भगवान शिवाचे ध्यान केले, त्याचे स्मरण केले, तर विजय निश्चित आहे. आमचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून आलेली प्रेरणा हीच आहे. विजय मिळवून देणारे तेच आहेत.’


स्वतंत्र भारतात अहिंसेविषयीच्या पत्राला उत्तर न देणारे मोहनदास गांधी !

‘गांधीजींनी एक गोष्ट चांगली सांगितली होती की, ‘तुम्ही लघुउद्योग वाढवा, आपल्याला मोठे कारखाने नकोत.’ ते अहिंसेला प्रोत्साहन देत होते; परंतु काँग्रेसने सर्वच ठिकाणी अहिंसेचे धोरण कृतीत आणले नाही. आमचे सभापती डॉ. नंदिनीरंजन सेनगुप्ता यांनी एक खुले पत्र बांगला, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये गांधीजींना लिहिले. हे पत्र बंगाली भाषेतील तत्कालीन प्रमुख नियतकालिक ‘अमृतबझार’सह कोलकात्याच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आले. लोक डॉ. नंदिनीरंजन सेनगुप्ता यांना दूरभाष करू लागले. ते भारतातील प्रसिद्ध आधुनिक वैद्य झाले होते. लोक त्यांना म्हणाले, ‘‘आता रुग्ण उपचारांसाठी तुमच्याकडे येणार नाहीत. तुमच्या चिकित्सालयाला कुलूप लावावे लागेल.’’ तसे काही झाले नाही. उलट त्यांचा खासगी वैद्यकीय व्यवसाय पुष्कळ वाढला. त्यांच्या पत्राला काहीच उत्तर आले नाही. भागलपूर येथील टीएन्जी महाविद्यालयात प्रा. हरलाल दासगुप्ता प्राध्यापक होते. त्यांनी जेव्हा हे खुले पत्र लोकांमध्ये वितरित केले, तेव्हा तेथे हरताळ पाळण्यात आला. लोक त्यांना भेटत होते. तेव्हा ते म्हणाले की, पापाचे ढोंग वाढते; परंतु ते फार काळ टिकत नाही.

– (पू.) डॉ. शिवनारायण सेन, संपादक, मासिक ‘ट्रूथ’, शास्त्र-धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल