India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !

प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या अवमानाच्या प्रकरणी भारत सरकारची बांगलादेशाला चेतावणी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – बांगलादेश सरकारने तेथील कट्टरपंथी घटकांवर लगाम घालणे अत्यंत आवश्यक आहे. तिथे रहाणारे हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक समुदायांचे लोक यांचे रक्षण करणे, हे बांगलादेश सरकारचे घटनात्मक दायित्व आहे. अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बांगलादेशाला श्रीराम मूर्तीच्या अवमानाच्या प्रकरणावरून सुनावले.

बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.

‘जस्टिस मेकर्स बांगलादेश इन फ्रान्स’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनेही बांगलादेशातील या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे कृत्य बांगलादेशाच्या स्वतःच्या राज्यघटनेच्या आणि जागतिक मानवाधिकार नियमांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे म्हटले आहे.