Pakistani Terrorists To Infiltrate India :  ८०० पाकिस्तानी आतंकवादी भारतात घुसखोरीच्या सिद्धतेत !

काश्मीर सीमेजवळ ७० आतंकवादी ‘लाँच पॅड’ कार्यरत

(लाँच पॅड म्हणजे प्रशिक्षित आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी एकत्र आणण्याचे ठिकाण)

७० आतंकवादी ‘लाँच पॅड’ पुन्हा कार्यरत

नवी देहली – गुप्तचरांच्या अहवालांनुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) आणि त्याच्या सैन्याने नियंत्रण रेषा अन् आंतरराष्ट्रीय सीमा येथे अनुमाने ७० आतंकवादी ‘लाँच पॅड’ पुन्हा कार्यरत केले आहेत. या ठिकाणी जवळपास ८०० आतंकवादी घुसखोरीसाठी सिद्ध असून त्यामुळे येथे तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकच्या सैनिकी संस्थांमध्ये ‘हमास’च्या लोकांना दिले जात आहे प्रशिक्षण ! – पाकच्याच खासदाराचा दावा !

दुसरीकडे पाकिस्तानचे खासदार मुशाहिद हुसेन सैयद यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानमधील सैनिकी संस्थांमध्ये ‘हमास’शी संबंधित लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. विशेषतः ‘पाकिस्तान नेव्ही वॉर कॉलेज’चा उल्लेख करत त्यांनी तेथे हमासच्या लोकांशी भेट झाल्याचे सांगितले.

गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांनी या वेळी भारतात घुसखोरीसाठी नवी रणनीती आखली आहे. या योजनेनुसार आतंकवाद्यांना लहान गटांमध्ये विभागून जम्मू-कश्मीरमधील वेगवेगळ्या भागांतून त्यांना एकाच वेळी भारतात पाठवण्याची सिद्धता आहे. प्रत्येक गटात अनुमाने १० ते १५ प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज आतंकवादी असू शकतात. या रणनीतीचा उद्देश एकाच वेळी अनेक ठिकाणी हालचाली वाढवून भारतीय सुरक्षादलांवर दबाव आणणे, हा आहे. पाकिस्तानकडून प्रथमच हमासशी संबंधित घटकांना प्रशिक्षण दिल्याचे सार्वजनिकरित्या मान्य करण्यात आले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बंद झाले होते ‘लाँच पॅड’ !

मार्च २०२६ मधील ‘अमेरिकी काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’च्या अहवालातही पाकिस्तानचा ‘भारतविरोधी आतंकवादी संघटनांचे केंद्र’, असा उल्लेख करण्यात आला आहे. हा कालावधी मे २०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा आहे, ज्यामध्ये २२ एप्रिल २०२५ यादिवशी झालेल्या पहलगाम आक्रमणाच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर यांमधील ९ आतंकवादी ठिकाणांवर आक्रमण करण्यात आले होते. त्या कारवाईनंतर काही काळ ‘लाँच पॅड’ हटवण्यात आले किंवा आतल्या भागात हलवण्यात आले; मात्र २०२५ च्या शेवटी आणि वर्ष २०२६ च्या प्रारंभी ते पुन्हा कार्यरत करण्यात आले.

आखातातील परिस्थितीचा अपलाभ उठवण्याचा प्रयत्न !

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचा उद्देश आखातातील संघर्षजन्य परिस्थितीचा अपलाभ उठवणे, हा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या अपयशामुळे आतंकवादी संघटनांकडून आय.एस्.आय.वर जम्मू-कश्मीरमध्ये ठोस कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. यामुळे आतंकवाद्यांची संख्या वाढल्याचे मानले जाते. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमधील उरी, नौशेरा, राजौरी आणि सुंदरबनी येथे आतंकवाद्यांचे घुसखोरीचे अनेक प्रयत्न सुरक्षादलांनी उधळून लावले आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारताच्या ठिकाणी इस्रायल असता, तर अशी बातमी समोर येण्याऐवजी पाकमध्ये घुसून लाँच पॅड उद्ध्वस्त करून ८०० आतंकवाद्यांना ठार मारल्याची बातमी आली असती !
  • हे आतंकवादी भारतात घुसखोरी करतील आणि भारतीय सैनिक त्यांना ठार मारतील, असेच वर्षानुवर्षे चालू आहे आणि पुढेही चालू रहाणार आहे. आतंकवाद्यांचा समूळ नाश होण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून कुठलेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !