आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis

  • वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक सिद्धता

  • ‘डिस्कव्हरी’ आणि ‘जिओग्राफी’ दूरचित्रवाहिन्यांद्वारे वारी सोहळा जगभर पोचणार

बैठकीत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाची श्रद्धा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा यांचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम ‘डिस्कव्हरी’ आणि ‘जिओग्राफी’ या दूरचित्रवाहिन्यांद्वारे जगभरात पोचवला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वसिद्धतेची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

बैठकीत सिद्ध करण्यात आलेले विशेष चित्र

या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पालखी सोहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि सक्षमीकरण करण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वारकर्‍यांच्या मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर ‘जर्मन हँगर’ (मोठा मंडप) उभारण्यात आले असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, तसेच इतर पालख्यांच्या मुक्कामस्थळीसुद्धा ‘जर्मन हँगर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लाखो वारकर्‍यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.’’ पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

वारी सोहळा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करावा ! – मुख्यमंत्री

‘डीजे’ (मोठ्या आवाजातील ध्वनीयंत्रणा) मुक्त वारी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत. वारी सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.