जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्‍वराला जलाभिषेक !

संकटात संततधार जलाभिषेक करून देव पाण्यात ठेवण्याची आचरेवासियांनी पाळली परंपरा !

साखळी पद्धतीने जलाभिषेकासाठी विहिरीतील पाणी मंदिरात आणतांना ग्रामस्थ

मालवण – संकटात देवावर संततधार जलाभिषेक करून देव पाण्यात ठेवण्याची आचरे गावाची प्राचीन परंपरा आहे. सध्या ओढवणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वत्र दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तसेच निसर्गाची अवकृपा दूर व्हावी, चांगले पर्जन्यमान व्हावे, शेतकर्‍यांवरील संकट दूर व्हावे, या उद्देशाने २३ जून या दिवशी आचरा येथील श्री रामेश्‍वर मंदिराच्या शेजारी असलेल्या श्री ठाणेश्‍वर मंदिरातील पिंडी पाण्याखाली जाईपर्यंत सर्वांच्या सहकार्याने जलाभिषेक करण्यात आला.

देवस्थानचे मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्यासह समस्त आचरेवासियांनी एकत्र येऊन ही सेवा केली. अनुमाने सव्वा घंटा चालू असलेल्या या जलाभिषेकाला श्री रामेश्‍वर मंदिराच्या शेजारी असलेल्या विहिरीवरून सर्व मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी कळशा अन् बादल्या भरून जल आणून अभिषेक केला. प्रारंभी श्री देव रामेश्‍वर आणि श्री देव ठाणेश्‍वर यांच्या चरणी सांगणे करून पारंपरिक ताशाच्या वाद्यावर जलाभिषेकास प्रारंभ करण्यात आला. अनुमाने १ घंट्यानंतर संपूर्ण गाभारा पाण्याने भरून श्री देव ठाणेश्‍वर पिंडी पाण्याखाली गेली. यामागे श्री देव रामेश्‍वर, ठाणेश्‍वर यांच्या कृपेने नैसर्गिक आपत्ती दूर होईल, अशी सर्वांची श्रद्धा आहे. पूर्वीही अशा प्रकारे संकट दूर झाली आहेत. आमच्या रुढी परंपरेनुसार जनकल्याणासाठी आणि निसर्ग पालटामुळे आलेल्या दुष्काळाच्या संकटाला दूर करण्यासाठी आम्ही आचरेवासियांनी देवाला आमच्या परंपरेनुसार साकडे घातले, असे देवस्थान समितीचे सदस्य संजय मिराशी यांनी सांगितले.