मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !

  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन !

  • लवकरच संयुक्त बैठक बोलावणार !

गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
श्री. सुनील घनवट, श्री. सतीश सोनार

मुंबई, २५ जून (वार्ता.) – मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे गाड्यांमध्ये चालणारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे छुप्या धर्मांतराचे षड्यंत्र आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍या भोंदूबाबांची विज्ञापने यांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार विशेष नियमावली (एस्.ओ.पी.) सिद्ध करील, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या धर्मद्रोही कृत्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे.

लोकल गाड्या बनल्या ख्रिस्ती मिशनरी आणि भोंदूबाबा यांचे केंद्र !

पनवेल-सी.एस्.एम्.टी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेस) मार्गावरील वातानुकूलित लोकलसह अन्य रेल्वे गाड्यांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘जीवनारेखा हवी आहे का ?’ किंवा ‘येशू हाच एकमेव देव आहे’ अशी पत्रके वाटली जातात. याद्वारे हिंदु प्रवाशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे जाळे विणले जात आहे. यासह मध्य, पश्चिम आणि हार्बर या मार्गांवरील लोकलगाड्यांमध्येही केवळ प्रार्थनेने कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करणारी पत्रके, तसेच ‘बंगाली बाबा’, ‘१०० टक्के वशीकरण’ अशी फसवी आणि समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलणारी विज्ञापने चिकटवल्यामुळे निष्पाप प्रवाशांची मोठी आर्थिक आणि मानसिक लूट चालू आहे. या समाजविघातक अन् धर्मद्रोही प्रकारांची गंभीर नोंद घेत हिंदु जनजागृती समितीने पोलीस महासंचालक आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन देऊन मुख्य सूत्रधारांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने १५ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास तीव्र जनआंदोलन करण्याची चेतावणीही समितीने दिली होती.

गृहराज्यमंत्र्यांकडून समितीच्या मागण्यांची तात्काळ नोंद !

या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. सतीश सोनार आणि श्री. रवींद्र नलावडे यांच्या शिष्टमंडळाने २५ जून या दिवशी गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. अनेक वर्षांपासून चालू असलेला हा प्रकार कायमचा मोडून काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मान्य करत गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आजपासूनच ‘एस्.ओ.पी’ (विशेष नियमावली) सिद्ध करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला दिला.

हिंदु जनजागृती समितीने गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या –

१. केवळ वरवरची कारवाई न करता संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी रेल्वेने ‘व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ चालू करावी आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी.

२. विज्ञापनांवरील दूरध्वनी क्रमांक आणि संकेतस्थळ यांचे सायबर पोलिसांद्वारे अन्वेषण करावे. भोंदूबाबा, संबंधित संस्था आणि अशी विज्ञापने छापणारी मुद्रणालये यांच्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवून त्यांचे परवाने कायमचे रहित करावेत.

३. गेल्या ५ वर्षांत अशा अनधिकृत आणि फसव्या विज्ञापनांवर रेल्वे प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली ?, याची ‘श्वेतपत्रिका’ घोषित करून ती जनतेसमोर आणावी.