‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

(‘एल निनो’ म्हणजे एक नैसर्गिक हवामानविषयक घटना, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी सामान्यहून अधिक उबदार होते.)

सातारा, २४ जून (वार्ता.) – प्रशांत महासागरातील पालटत्या हवामान स्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचे अनियमित वितरण, पावसातील दीर्घ खंड, उशिरा मान्सूनचे आगमन, अल्प पर्जन्यमान, तापमानात वाढ आणि मान्सूनची लवकर माघार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

फरांदे म्हणाल्या, ‘‘एल निनो’ आणि संभाव्य खतटंचाईचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने जिल्हाभर विविध जनजागृती मोहिमा, शिवार फेर्‍या, शेतीशाळा, गाव बैठका आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनुमाने १३ सहस्र मोहिमा आणि बैठकींच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत मार्गदर्शन पोचवण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना एकात्मिक शेती पद्धती, आंतरपीक आणि मिश्रपीक लागवडीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. सोयाबीन-तूर, बाजरी-तूर, मूग-उडीद, ऊस-भाजीपाला अशा मिश्रपीक पद्धतीमुळे एखाद्या पिकाची हानी झाल्यास दुसर्‍या पिकातून उत्पादन मिळू शकते.’’

योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ !

पीक उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी शून्य किंवा अल्प मशागत, एकात्मिक खत व्यवस्थापन, जैविक खते आणि जैविक कीडनियंत्रण तंत्रांचा उपयोग करावा. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत, गांडूळ खत, चिकट सापळे यांसारख्या घरगुती निविष्ठांचा उपयोग करून खर्चात बचत करता येईल, तसेच अल्प कालावधीची आणि ताण सहन करणारी वाणे निवडण्यावर भर द्यावा. यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक असला, तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यास हानी टाळून उत्पादनात स्थिरता राखणे शक्य होईल, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.