मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !


मुंबई –
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या संदर्भातील शोकप्रस्ताव मांडतांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेचा अशुद्ध उच्चार केला. या प्रकरणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधक यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर २४ जूनला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.

अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘पहिल्या दिवशी पटलावर एकूण १२ शोकप्रस्ताव होते. ते ज्या कागदावर छापून मला दिले होते, त्यावरील अक्षरांचा आकार अत्यंत लहान आणि अस्पष्ट होता. त्या छापील प्रतींमध्ये काही तांत्रिक चुका होत्या. त्यामुळे समोर जसे आले, तसे वाचन करतांना ही अनपेक्षित चूक घडली. आशाताई भोसले यांचा अवमान करण्याचा विचार महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्वप्नातही करू शकत नाही. तरीही यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

दोषींवर कठोर कारवाई करा ! – आमदार अजय चौधरी

यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले, ‘‘राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या विधानसभेच्या अध्यक्षांची प्रतिमा मलीन होईल, अशी सदोष आणि चुकीची छापील प्रत देणारी जी काही यंत्रणा किंवा कुणी व्यक्ती असेल, तिचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.’’