Maharashtra Mandir Nyas Parishad : गड-दुर्गांवरील अतिक्रमणे बुलडोझरने उद्ध्वस्त करणार ! – रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले

  • १ सहस्र १०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत सातारा येथे पार पडली ‘चतुर्थ महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

  • मंदिरांच्या भूमीवर डोळा ठेवणार्‍यांना सरकारचा हिसका दाखवू !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. गिरीष शहा, श्री. सुनील घनवट, महंत मावजीनाथ महाराज, योगी निरंजन नाथ महाराज, मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, सद्गुरु स्वाती खाडये, अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र ही संत आणि मंदिरे यांची पावन भूमी आहे. मंदिरांच्या भूमींवर ज्यांनी डोळा ठेवला आहे किंवा तिथे अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन हिसका दाखवल्याविना रहाणार नाही. ज्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अतिक्रमण भुईसपाट केले, त्याच धडाडीने हे शासन गड-दुर्ग आणि मंदिरे यांच्या भूमींवरील अतिक्रमणेही बुलडोझर लावून नष्ट करील, असे रोखठोक उद्गार राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी येथे काढले.

रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २२ मार्च या दिवशी सातार्‍याच्या ऐतिहासिक भूमीत स्वराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित ‘चतुर्थ महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी आणि एक हिंदुत्वनिष्ठ बांधव म्हणून त्यांचे विचार मांडले.

देवस्थानाच्या भूमींचा केवळ ‘देवकार्यासाठी’च वापर !

व्यासपिठावर डावीकडून श्री. शिवाजीराव तुपे, योगी निरंजन नाथ महाराज, श्री. सुनील घनवट, श्री. भरतशेठ गोगावले, सद्गुरु स्वाती खाडये, सद्गुरु सत्यवान कदम

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या भूमीत अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच पावन सातार्‍यात परिषदेला १ सहस्र १०० हून अधिक मंदिरांचे प्रतिनिधी एकत्रित आले आहेत. आमच्यासाठी मंदिरांचे रक्षण करणे, हे राजकारण नसून तो आमच्या धर्म आणि श्रद्धा यांचा विषय आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ‘देव आणि देश’ यांच्यासाठी कधीही तडजोड न करण्याची शिकवण दिली होती. ‘देवस्थानाच्या भूमींचा वापर केवळ देवकार्यासाठीच व्हावा’, अशी सूचना महसूल विभागाला देण्यात आली आहे. वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात धार्मिक पर्यटनासाठी मोठे प्रावधान करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी आणि समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच ५० निवडक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरणासाठी ‘प्रादेशिक पर्यटन विकास योजने’तून निधी संमत केला आहे, असे श्री. गोगावले यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील मंदिरांच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.

राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरतशेठ गोगवले यांना विविध मंदिर विश्वस्तांकडून जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावरील मुद्रांक नोंदणी शुल्क माफ करण्याविषयी निवेदन देण्यात आले !

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत ‘विशेष बैठक’ ठरवून मंदिरांचे प्रलंबित प्रश्न सोडवू !

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. मला संधी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या परिषदेची माहिती देतो. मंदिर महासंघ हे केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सभा घेत नाही. केवळ हिंदुत्व आणि मंदिरे यांसाठी या सभा आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनात ढवळाढवळ करण्याचा हेतू नाही. परंपरेत बाह्य हस्तक्षेप होणार नाही, याची ग्वाही देतो. मंदिर महासंघ हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जागृतीचे काम करत आहे, हे कौतुकास्पद आहे. मंदिर महासंघाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ‘विशेष बैठक’ ठरवून सर्व प्रलंबित प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवले जातील, असे श्री. गोगावले यांनी सांगितले.

मंदिरे सुरक्षित राहिली, तरच देव, देश आणि धर्म सुरक्षित राहील ! – योगी निरंजन नाथ, मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान

ज्या भूमीत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘हिंदवी स्वराज्या’ची शपथ घेतली, त्या पराक्रमी वारशाचे आपण प्रतिनिधी आहोत. आज मंदिरे वाचवण्यासाठी सर्व विश्वस्त एकत्र येणे, हीच या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची खरी संजीवनी आहे. मंदिरे सुरक्षित राहिली, तरच आपला देव, देश आणि धर्म सुरक्षित राहील.

आज जगन्नाथपुरीची यात्रा मोठी मानली जात असली, तरी व्यवस्थापन, नियोजन आणि भक्तीभाव यांत ‘आषाढी वारी’ ही विश्वातील सर्वश्रेष्ठ वारी आहे. भारताने जगाला व्यवस्थापनाची देणगी दिली आहे, त्यामुळे जगाने आम्हाला व्यवस्थापन शिकवण्याची आवश्यकता नाही. मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणार्‍यांचा डाव उधळून लावा. दुर्दैवाने आपल्याच काही मंडळींनी मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत. मंदिरांची एक इंचही भूमी जाता कामा नये, यासाठी प्रत्येक विश्वस्ताने सजग राहिले पाहिजे. काही लोक ‘मंदिरांच्या जागी शाळा-रुग्णालये बांधा’, असे म्हणतात; मात्र कोरोना महामारीसारख्या भीषण संकटात याच मंदिरांनी कोट्यवधी लोकांना अन्नदान करून वाचवले, हे विसरता येणार नाही. जयसिंगपूरचे श्री स्वामी समर्थ केंद्र आणि पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर यांच्या सेवेचा आदर्श सर्वांसमोर आहे.

परिषदेला उपस्थित हिंदू

इंद्रायणीची महाआरती अन् भक्तीचा जागर !

योगी निरंजन नाथ यांनी सांगितले की, आळंदीत चालू केलेल्या ‘इंद्रायणी महाआरती’ला आज १० सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित रहात आहेत. पुढील ५ वर्षांत वारीतील गर्दी दुप्पट होणार असून देवतांचे उपचार शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यास भगवंतच आपल्याला सर्व संकटांतून साहाय्य करेल. देवतांचे प्रतिनिधी म्हणून आज आपण या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत, हेच हिंदूसंघटनाचे मोठे यश आहे.

मंदिरे केवळ उपासनेची केंद्रे नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृती यांचा प्राण ! – संदीप सिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक

जगातील अनेक मोठी शहरे कारखान्यांमुळे उभी राहिली आणि कारखाने बंद पडताच ती नष्ट झाली; मात्र अयोध्या, काशी, उज्जैन आणि तिरुपती यांसारखी शहरे सहस्रो वर्षांपासून केवळ मंदिरांमुळे जिवंत आहेत. मंदिरे ही केवळ प्रार्थनेची स्थळे नसून ती आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत. ‘समाजातील मंदिर अर्थव्यवस्थेचे महत्त्व’ या विषयावर श्री. संदीप सिंह यांनी विचार मांडले.

श्री. संदीप सिंह पुढे म्हणाले की, जर मंदिरे सुरक्षित राहिली नाहीत, तर आपली संस्कृती नष्ट होईल. तमिळनाडूतील मंदिरे समाजमनापासून तुटल्यामुळे संकटात आहेत. ती चूक आपण महाराष्ट्रात होऊ देता कामा नये. प्रत्येक िहंदूने मंदिराचा कार्यकर्ता बनून धर्माचे रक्षण केले पाहिजे.

Live | चतुर्थ महाराष्ट्र राज्य मंदिर-न्यास परिषद | Session 1 | Satara

प्रत्येक हिंदूने प्रतिदिन मंदिरात जावे !

श्री. संदीप सिंह पुढे म्हणाले की, पाश्चात्त्य पद्धतीने केक कापण्यापेक्षा स्वत:चा वाढदिवस मंदिरात साजरा करून धर्माशी नाते जोडा. मंदिरांनी आयुर्वेदिक वैद्यांना मंदिर परिसरात स्थान दिले पाहिजे; जेणेकरून समाजाची सेवा होईल. मी माझ्या ‘टी-शर्टवर ‘मंदिरात जा’, असे लिहून फिरतो. त्यामुळे हे पाहून माझे मित्र वाढले आहेत. आपण हिंदु आहोत आणि मंदिरात जातो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा.

मंदिर परिषदेला उपस्थित संत, मान्यवर !

परिषदेला उपस्थित मान्यवर

श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे, ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. विठ्ठल स्वामी वडगावकर, ‘स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थान’चे पू. उदय शेकडे, ह.भ.प. पुरुषोत्तम कुलकर्णी; दत्त मंदिर, पळशी येथील पू. जगदीश पिसाळ महाराज, रत्नागिरी येथील ‘पतंजली योग समिती’चे अधिवक्ता विद्यानंद जोग, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. विजयराव गाढवे, मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. बाबासाहेब पाटील, तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे मठाधीश महंत मावजीनाथ महाराज, अहिल्यानगर येथील ‘संजिवनी भारती आखाड्या’चे महंत सोहम भारती, ‘श्री हनुमान मंदिर नॉर्दन ब्रॅच’चे श्री. विलास पुंड, अकोला येथील पुरातन महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. अमल मलगुंडे, ‘नाथनगरी’चे संपादक आणि श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, खरसुंडीचे (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली) विश्वस्त श्री. भरत पाटील, यवतमाळ येथील ‘श्री महादेव मंदिर मणदेव’चे अध्यक्ष श्री. अशोक खोडकुंभे, अमरावती येथील ‘श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री’चे अध्यक्ष श्री. कैलास पनपालिया, ‘श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड’चे व्यवस्थापक श्री. उदयजी रोकडे, समर्थभक्त श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, वारकरी संप्रदायाचे सातारा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. बबनराव सापते महाराज, सातारा येथील श्री पाटेश्वर देवस्थानाचे पू. विशाल महाराज, नेरूळगाव येथील गावदेवी मंदिराचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील, जुना नागपाडा (मुंबई) येथील नागोबा मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष श्री. प्रकाश राणे, वसई (जिल्हा पालघर) येथील ‘मूरूगन अँड बालाजी मंदिरा’चे विश्वस्त श्री. राधास्वामी, श्री. रविचंद्रम मूथ्यू, बेलापूर (नवी मुंबई)येथील ‘लक्ष्मी माता महिला मंडळा’च्या अध्यक्षा साध्वी चंदा दास, बत्तीस शिराळा (सांगली) येथील शिवमंदिराचे विश्वस्त श्री. धोडिंराम मुळीक.