वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्‍यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !

‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’

मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – वारीमध्ये दुर्घटनेत मृत्यू आल्यास, अपघात झाल्यास, तसेच नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा दुर्घटनाग्रस्त वारकर्‍यांसाठी राज्यशासनाने ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ योजना घोषित केली आहे. १३ जुलै या दिवशी महसूल विभागाकडून याविषयीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्‍या व्यक्तींसाठी वर्ष २०२२-२०२३ ते २०२५-२०२६ या कालावधीसाठी शासनाने आर्थिक साहाय्य करण्याविषयीचा शासन निर्णय काढला आहे. २७ मार्च २०२३ या दिवशी काढण्यात आलेल्या या शासन निर्णयामध्ये बाधित व्यक्तीला आर्थिक साहाय्य करण्याविषयीचे निकष देण्यात आले आहेत. या शासन निर्णयाच्या आधारेच दुर्घटनेत पीडित वारकर्‍यांसाठी शासनाने आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.