Global Hindu Organizations Appeal : बांगलादेशातील हिंदूंचा पद्धतशीरपणे होत असलेला वंशविच्छेद रोखा !

जागतिक हिंदु संघटनांचे आवाहन !

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशातील हिंदूंवरील चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक हिंदु संघटनांच्या नेत्यांनी एक आवाहन प्रसिद्ध केले आहे. या पत्रात महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशातील हिंदूंना वाढत्या हिंसाचाराला आणि छळाला सामोरे जावे लागत असल्याविषयी खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ‘बांगलादेशातील हिंदूंचा पद्धतशीर वंशविच्छेद रोखा’, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘हिंदूज अ‍ॅडव्हान्सिंग ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह’च्या समन्वयाने सिद्ध करण्यात आलेल्या या पत्राला १५ देशांतील १२५ पेक्षा अधिक संस्था आणि व्यक्ती यांनी पाठिंबा दिला आहे. या पत्रात संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, युरोपीय संघ, भारत आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांना हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास स्थानिक धार्मिक अल्पसंख्यांकांचा वंशविच्छेद  होण्याचा धोका आहे, अशी चेतावणी या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

१. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनात हिंदु अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी  आंतरराष्ट्रीय चिंता वाढली आहे.

२. ऑगस्ट २०२४ मधील बांगलादेशातील राजकीय संक्रमणानंतर हिंदूंच्या विरोधातील हिंसा, धमक्या आणि सक्तीचे स्थलांतर वाढले आहे.

३. बांगलादेशातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेविषयी आणि लोकशाही प्रक्रियेच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

‘हिंदूज अ‍ॅडव्हान्सिंग ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह’च्या समन्वयाने सिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक –

(चित्रावर क्लिक करा)

४. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा तेथील हिंदूची असणारी लोकसंख्या (१९५१ मध्ये असणारी, म्हणजे पूर्वीचे पूर्व पाकिस्तान येथील) २२% वरून ७% किंवा त्यापेक्षा कमी झाली आहे.

५. मानवाधिकार तज्ञांच्या मते, ही घट म्हणजे सातत्याने चालू असलेल्या जातीय आणि धार्मिक वंशविच्छेदाचा पुरावा आहे.

६. या आघाडीने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात ठोस उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये स्वतंत्र तथ्यशोधन मोहिमा, सार्वजनिक अहवाल सादर करण्याची बंधने आणि दायित्व निश्‍चित करणार्‍या यंत्रणांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

गेली ५५ वर्षे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. एरव्ही भारतातील अल्पसंख्यांकांच्या विरोधात खुट्ट झाले, तरी देशव्यापी हिंसाचार घडवला जातो, परंतु बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ जागतिक संघटना केवळ आवाहन करतात. यामुळे ‘हिंदूंचा वंशविच्छेद का होत रहाणार नाही ?’, असा कुणी प्रश्‍न विचारला, तर आश्‍चर्य काय ?