Bangladesh Aid : भारत बांगलादेशाला देत असलेल्या अर्थसाहाय्यामध्ये मोठी कपात

आता केवळ ६० कोटी रुपये देणार

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् व बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस

नवी देहली – भारत सरकारने वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशाला दिल्या जाणार्‍या साहाय्यात मोठी कपात केली आहे. यावर्षी बांगलादेशासाठी केवळ ६० कोटी रुपयांचे प्रावधान ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १२० कोटी रुपये दिले होते. म्हणजेच भारताने बांगलादेशाचे साहाय्य निम्मे केले आहे. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशात अल्पसंख्य हिंदु समुदायाविरुद्ध होणारी हिंसा आणि तेथील परराष्ट्र धोरणातील पालट, ही याची मुख्य कारणे मानली जात आहेत. वर्ष २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशाने पाकिस्तानसमवेत त्याचे संबंध सशक्त करण्यास चालू केले आहे.

अर्थसंकल्पात बांगलादेशाच्या व्यतिरिक्त मालदीवला ५५० कोटी रुपयांचे, तर म्यानमारला ३०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. (मालदीवनेही भारतविरोधी कारवाया केल्या होत्या. त्याला अर्थसाहाय्य देऊन काय साध्य होणार आहे ? – संपादक) या अर्थसंकल्पात भारताने भूतानसाठी २ सहस्र २८८ कोटी रुपयांचे प्रावधान ठेवले आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १३८ कोटी रुपये अधिक आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर आमचे सतत लक्ष ! – परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह

भारत सरकार बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या आक्रमणांच्या  वृत्तांवर सतत लक्ष ठेवून आहे. या आक्रमणांमध्ये त्यांची घरे, दुकाने, मालमत्ता आणि प्रार्थनास्थळे यांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले. भारताने अनेक वेळा राजकीय आणि राजनैतिक स्तरावर बांगलादेश सरकारसमोर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचे सूत्र उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ४ एप्रिल २०२५ या दिवशी बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांच्या भेटीच्या वेळी हे सूत्र उपस्थित केले होते, असे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले.

बांगलादेश-पाकिस्तान संबंधात वाढ !

बांगलादेशाचे सध्याचे सरकार पाकिस्तानसोबत संबंध सशक्त करण्यात गुंतले आहे.  दोन्ही देशांमध्ये थेट मालवाहू नौका चालू झाल्या आहेत. अलीकडेच ढाका येथून एक विमान कराचीला पोचले, ज्यामुळे १४ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये थेट हवाई सेवा पुन्हा चालू झाली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाच्या भारतविरोधी कारवाया पहाता, त्याला ६० कोटी रुपयेही देऊ नयेत, असेच राष्ट्रप्रेमी भारतियांना वाटते ! बांगलादेशावर हे पैसे उधळण्यापेक्षा भारतातील हिंदूंवर हे पैसे खर्च करावेत !