Bangladesh Elections Hindus Genocide : हिंदूंची हत्या करा आणि निवडणूक जिंका !

बांगलादेशात निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांचे मोठे षड्यंत्र !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात निवडणूक जिंकण्यासाठी घृणास्पद योजना राबवली जात असल्याचे समोर आले आहे. १२ फेब्रुवारीला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अल्पसंख्यांक हिंदु समाजाविरोधात हिंसा भडकवण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक लढवणारे अनेक नेते हिंदुविरोधी भाषणबाजीला निवडणुकीचे सूत्र बनवून मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. त्यामुळे तेथे निरपराध हिंदूंच्या हत्या का होत आहेत ?, याचे उत्तर जगासमोर आले आहे.

हिंसा भडकवण्याची रणनीती

गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, मागील आठवड्यात काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हिंदूंच्या विरोधात हिंसा भडकवण्याची रणनीती आखण्यात आली. हा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी कट्टरतावादी घटकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. अधिकार्‍यांच्या मते, देशातील अल्पसंख्यांक समाजाची स्थिती अत्यंत चिंताजनक असून निवडणुका जवळ येताच हिंसा वाढण्याची शक्यता आहे.

निवडणूक चर्चेची पालटती दिशा

बांगलादेशावर लक्ष ठेवणार्‍या तज्ञांचे म्हणणे आहे की, या वेळी निवडणूक विकास, सुरक्षा किंवा आर्थिक सूत्रे यांवर लढवली जाणार नाही. त्याऐवजी संपूर्ण निवडणूक चर्चा हिंदुविरोधी आणि भारतविरोधी कथनकाभोवती फिरू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार काही नेते कट्टरतावादी घटकांना चिथावणी देत भारताने शेख हसीना यांना आश्रय दिला असल्याचा दावा करत आहेत. तसेच बांगलादेशातील हिंदू भारतसमर्थक आहेत आणि त्यामुळे त्यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही, असा प्रचार केला जात आहे.

खोट्या कथांचा वापर

एका अन्य अधिकार्‍याने सांगितले की, या कटातील महत्त्वाचा भाग म्हणजे अल्पसंख्यांक हिंदु समाजाविरोधात बनावट कथा सिद्ध करणे, हिंदूंवर चोरी आणि अन्य गुन्ह्यांचे खोटे आरोप करणे, असे प्रकार केले जाणार आहेत, जेणेकरून स्थानिक लोक त्यांच्या विरोधात हिंसा करतील. शेख हसीना हेही निवडणूक राजकारणातील मोठे सूत्र ठरले आहे. अनेक पक्ष त्यांना भारतसमर्थक आणि बांगलादेशविरोधी ठरवत आहेत. भारताने हसीना यांना आश्रय दिल्याचे आरोप होत आहेत, तर बांगलादेशाने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. तज्ञांच्या मते ही रणनीती कितपत यशस्वी ठरेल ?, याचा अंदाज बांधणे कठीण आहे; मात्र बांगलादेशातील मोठा वर्ग पाकिस्तानसोबत नव्हे, तर भारतासमवेत चांगले संबंध ठेवू इच्छितो.

जमात-ए-इस्लामीला लाभ : परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार भारतविरोधी आणि हिंदुविरोधी भाषणबाजीमुळे जमात-ए-इस्लामीला मोठा लाभ होत आहे. येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडण्याचीच सर्वांत मोठी चिंता आहे. देशातील अनेक हिंदु कुटुंबे भीतीच्या वातावरणात जगत आहेत. हिंसा वाढल्यास मोठ्या प्रमाणावर स्थलांतराची स्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी सीमावर्ती भागांवर अतिरिक्त ताण येईल. ‘जमात’समर्थित महंमद युनूस सत्तेत आल्यानंतर हे भाग आधीच संवेदनशील झाले आहेत.

हिंदूंच्या लोकसंख्येतील घट

बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील अत्याचार नवे नाहीत. अनेक वर्षांपासून हे चालू असून काळानुसार त्यांच्या लोकसंख्येतही मोठी घट झाली आहे. अधिकार्‍यांच्या मते, या वेळी परिस्थिती अधिक गंभीर आहे; कारण हा केवळ छळ नाही, तर मतपेढीच्या राजकारणाचा सुनियोजितभाग बनला आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे, जेव्हा काही नेते देशात इस्लामी राज्य स्थापनेची मागणी करत आहेत आणि राज्यघटनेऐवजी शरीयत कायदा लागू करण्याची भाषा करत आहेत. अशा तणावपूर्ण वातावरणात बांगलादेशात रहाणार्‍या अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे.