JNU Protest : ‘जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मोदी-शाह यांची कबर खोदली जाईल’ अशा घोषणा !

  • देशद्रोही उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन रहित केल्यावरून विद्यार्थ्यांकडून जे.एन्.यू.त आंदोलन

  • (म्हणे) ‘राग व्यक्त करण्याचा एक मार्ग !’ – काँग्रेस

नवी देहली : राष्ट्रद्रोही घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात काही विद्यार्थी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कबर ‘जे.एन्.यू.’च्या भूमीवर खोदली जाईल’, अशा प्रकारच्या चिथावणीखोर घोषणा देत असल्याचे त्यात दिसत आहेत. हे विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन नाकारल्याच्या सूत्रावरून निषेध करत असल्याचे सांगितले जात आहे.

१. सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या या ३५ सेकंदांच्या व्हिडिओवरून विद्यार्थी संघटनेने, तसेच काँग्रेसने त्या विद्यार्थ्यांना पाठीशी घातले आहे.

२. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अदिती मिश्रा यांनी सांगितले की, प्रतिवर्षी विद्यार्थी ५ जानेवारी २०२० या दिवशी विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी निदर्शने करतात. सर्व घोषणा वैचारिक होत्या आणि त्या कुणावरही वैयक्तिक आक्रमण नव्हते. त्या कुणालाही उद्देशून नव्हत्या. (मिश्रा यांचे या वक्तव्यावर एखाद्या शेंबड्या पोराचा तरी विश्वास बसेल का – संपादक)

३. घोषणांवरून काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, हा राग व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यासमवेत असे यासाठी केले जात आहे; कारण ते मुसलमान आहेत.

काय घडले होते ५ जानेवारी २०२० या दिवशी ?

जवाहरलाल नेहरू विद्यापिठात या दिवशी हिंसाचार उसळला होता. मुखवटा घातलेल्या काही लोकांनी विद्यापिठातील ३ वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यावर लाठ्या, दगड आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण केले. यात किमान २८ लोक घायाळ झाले होते. हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई न केल्याचा आरोप देहली पोलिसांवर करण्यात आला होता.

त्याच कालावधीत झालेल्या देहली दंगलीच्या प्रकरणात शरजील इमाम २८ जानेवारीपासून आणि उमर खालिद १३ सप्टेंबर २०२० पासून कोठडीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५ जानेवारी २०२५ या दिवशी त्या दोघांची जामीन याचिका फेटाळून लावली.

संपादकीय भूमिका

  • असे आहे, तर वर्ष २०२० मध्ये याच देहलीत जेव्हा भाजप नेते अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांनी ‘देशविरोधी लोकांना गोळ्या घाला’, असे म्हटले, तेव्हा तो राग व्यक्त करण्याचा मार्ग नव्हता का ? काँग्रेसने त्या वेळी आकाशपाताळ एक करून त्यांना अटक करण्याची मागणी का केली ? काँग्रेसचा हा सोयीस्कर दुटप्पीपणा जाणा !
  • देशद्रोहाचा अड्डा बनलेले विद्यापीठ सरकार अजूनपर्यंत बंद का करत नाही ?, असा प्रश्न जनतेला पडला आहे !