Karnataka Pakistani Interference : बेंगळुरू येथील अनधिकृत घरांवरील कारवाईवरून पाकची टीका

पाडण्यात आलेली घरे बहुतांश मुसलमानांची !

डावीकडे डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील कोगिलू झोपडपट्टीतील अनधिकृत घरांना हटवण्यात आल्याच्या घटनेवर आता पाकिस्ताननेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घरे बहुतांश मुसलमानांची होती. या प्रकरणी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. या निवेदनात सरकारच्या पाठिंब्याने मुसलमानांच्या घरांवर कारवाई होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच ख्रिस्ती धर्मियांवर आक्रमण झाल्याच्या  घटनांचाही उल्लेख करून या घडामोडी गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले.

पाकच्या या विधानावर उत्तर देतांना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आणि विकासमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या विधानांना राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेतेच उत्तर देतील.

दुसरीकडे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक कल्याणमंत्री जमीर अहमद खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, या प्रकरणाशी पाकिस्तानचा संबंधच काय ? आपल्या देशातील अंतर्गत विषयांवर पाकिस्तान टिपणी का करतो ? मुसलमान समाजाची काळजी घेण्याचा अधिकार पाकिस्तानला कुणी दिला ? पाकने आधी त्याच्या देशातील गरिबी आणि परिस्थिती यांकडे त्याने लक्ष द्यावे.

पाकमध्येच अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात ! – भारत सरकारचे प्रत्युत्तर

रणधीर जयस्वाल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कठोर प्रतिक्रिया देत म्हटले की, ज्याचा या विषयातला इतिहास अत्यंत वाईट आहे अशा देशाच्या टिपणींना आम्ही फेटाळतो.

पाकिस्तानमध्ये विविध धर्मीय अल्पसंख्यांकांवर होणारे सातत्यपूर्ण आणि संघटित अत्याचार ही सर्वश्रुत वस्तूस्थिती आहे. इतरांवर आरोप करूनही पाकिस्तान ही सत्यता लपवू शकत नाही.

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती कुणी दिली ? – भाजप

भाजपचे नेते आर्. अशोक यांनी आरोप केला की,

(चित्रावर क्लिक करा)

बेंगळुरूतील कारवाईबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती कशी मिळाली ? येथे कुणीतरी त्यांना दूरभाष केला असणार. आतंकवादी घटकांकडून ही माहिती त्याच्यापर्यंत गेली असावी. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर अवघ्या एका दिवसात पाकिस्तानपर्यंत माहिती पोचते, याचा अर्थ येथे आतंकवादी सक्रीय आहेत, हे स्पष्ट दिसते.

संपादकीय भूमिका 

भारतात मुसलमानांच्या अवैध घरांवर होणार्‍या कारवाईवर पाककडून लगेच प्रतिक्रिया व्यक्त केली जाते; मात्र पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर, हिंदूंच्या मंदिरावर आक्रमणे होत असतांना भारत मौन धारण करतो !